ST Strike | राजकीय पक्षांमुळेच हे आंदोलन पेटलं का, चिघळलं का? पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही

| Updated on: Jan 10, 2022 | 4:51 PM

Sharad Pawar on St Strike : शरद पवार यांनी म्हटलंय, की मला एसटी संपाचं राजकारण करायचं नाही. मला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, माझ्यासाठी हा प्रश्न सुटणं जास्त महत्त्वाचं आहे.

ST Strike | राजकीय पक्षांमुळेच हे आंदोलन पेटलं का, चिघळलं का? पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रकार परिषदेत महत्त्वाची वक्तव्य केली. यावेळी त्यांना एसटीच्या लांबलेल्या संपाला कोण कारणीभूत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी मला एसटी संपाच्या विषयावरुन राजकारण करायचं नाही, असं उत्तर देत अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आज याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते.

कुणामुळे चिघळलं आंदोलन?

गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे. तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीनंतर अखेर एसटी कर्मचारी संघटनांच्याच वेगवेगळ्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेतून कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचं कळकळीचं आवाहन केलंय. अनिल परब आणि शरद पवार यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हे आवाहन केलं गेलं.

अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा

दरम्यान, यावेळी सगळ्यात शेवटी शरद पवार यांना आपली भूमिका मांडली. तेव्हा त्यांनी पत्रकारांनी प्रश्न केला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिने का लांबला? या मागे कुणी राजकारण केलं का? राजकीय पक्षांमुळे हे आंदोलनं पेटलं का? चिघळलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.

शरद पवार यांनी म्हटलंय, की मला एसटी संपाचं राजकारण करायचं नाही. मला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, माझ्यासाठी हा प्रश्न सुटणं जास्त महत्त्वाचं आहे. काहींनी याबाबत गैरसमज पसरवले आहेत. मात्र काहींनी दिशाभूल केल्यामुळेच हा संप चिघळला गेला, असंही शरद पवार यांनी म्हटलंय. काहींनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला. सरकार एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज पसरवला गेल्यामुळे हा संप अधिक चिघळला गेला असावा, असंही त्यांनी म्हटलंय.

बैठकीत काय झालं?

सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा अनिल परब, शरद पवार आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली. या एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आलं. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून त्यासोबत आता एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीन कामावर रुजू व्हाव, असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

इतर बातम्या –

सदावर्तेंना हटवलं! पवारांसोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले, फार मोठी चूक झाली…

Sharad Pawar | एस.टी.कर्मचाऱ्यांबाबत आजच सरकार का सकारात्मक झालं? पवार म्हणाले, पॉईंट असाय…

सातव्या वेतन आयोगानुसार एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार का? अनिल परबांनी पवारांच्या उपस्थितीत अट सांगितली