पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये दिल्लीत तासभर चर्चा, जयंत पाटलांनी सांगितलं नेमकं कारण

| Updated on: Jul 17, 2021 | 2:23 PM

देशातील नागरी बँका आणि सहकारी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ते बंधन करणी करावेत यासाठी शरद पवार दिल्लीत भेटीला गेल्याचं पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये दिल्लीत तासभर चर्चा, जयंत पाटलांनी सांगितलं नेमकं कारण
शरद पवार, नरेंद्र मोदी भेट, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
Follow us on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीगाठीमुळे राज्यकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांकडून विविध वक्तव्य केली जात आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार आणि मोदी भेटीमागचं नेमकं कारण सांगितलं आहे. देशातील नागरी बँका आणि सहकारी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ते बंधन करणी करावेत यासाठी शरद पवार दिल्लीत भेटीला गेल्याचं पाटील म्हणाले. ते आज सोलापुरात बोलत होते. (Sharad Pawar meets PM Narendra Modi on banking issue)

राजधानी दिल्लीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीतील तपशील अद्याप गुलदस्यात आहे. असं असलं तरी नव्याने निर्माण केलेल्या सहकार खाते, या खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकांवर आणण्यात आलेले निर्बंध या विषयांवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटील यांनी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ती बंधनं कमी करण्यासाठी शरद पवार दिल्ली मोदींच्या भेटीला गेले आहेत. पवार यांना बँकिंग क्षेत्रातील लोकांनी निवेदन पाठवली आहे. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची भेट झाल्याचं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याची चौकशी सुरु अशल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यावर बोलताना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. विरोधी पक्षाशी सल्ला मसलत करुनच महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैवी असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

पवार फडणवीस भेटीचीही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मोदींची भेट घेण्यापूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राजकीय चर्चा?

फडणवीस आणि पवार दिल्लीत भेटल्याने या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीत सहकारावर चर्चा झाली असून साखर कारखान्यांवर होत असलेल्या कारवाईवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असंही बोललं जात आहे. मात्र, हे सर्व तर्क असून त्याला दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.

संबंधित बातम्या :

“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

Sharad Pawar meets PM Narendra Modi on banking issue