1962 मध्येही भारताचा भूभाग गेला, ही राजकारणाची वेळ नाही, पवारांचा काँग्रेसला टोला?

| Updated on: Jun 27, 2020 | 8:04 PM

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "ही राजकारणाची वेळ नाही", असं म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे (Sharad Pawar on India China conflict).

1962 मध्येही भारताचा भूभाग गेला, ही राजकारणाची वेळ नाही, पवारांचा काँग्रेसला टोला?
Follow us on

सातारा : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “ही राजकारणाची वेळ नाही“, असं म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे (Sharad Pawar on India China conflict). शरद पवार साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी 1962 सालाच्या भारत-चीन युद्धाची आठवण करुन दिली. 1962 साली 45 हजार चौ.किमीचा भूभाग गेला. ते कसं विसरता येईल? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला (Sharad Pawar on India China conflict).

भारत-चीन सीमावाद सुरु असताना काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. याशिवाय काल (26 जून) महाराष्ट्रात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत-चीन सीमावादावरुन केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर आज शरद पवार यांनी ही राजकारणाची वेळ नाही म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

हेही वाचा : गलवान खोऱ्यात किती हल्ले झाले? दहा हजार चिनी सैन्य तैनात हे खरं आहे का? मोदींनी उत्तरं द्यावी : काँग्रेस

“चीन कुरापत नक्कीच करत आहेत. आपण आपला रस्ता आपल्या हद्दीत करत आहोत. आपण आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. सियाचीन भागासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. 1993 साली मी संरक्षण मंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी करार केला”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

“सीमा भागात गस्त घालताना काहीही होऊ शकतं. त्यामुळे लगेच संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणू नये”, असंही पवारांनी म्हटलं. “चीनने यापूर्वीच 1962 साली भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही, हे माहीत नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मोदींना प्रश्न

काँग्रेसने शुक्रवारी, 26 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले होते. “विरोधीपक्षांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणीही भारतात घुसलं नाही. एकही भारताची चौकी कुणाच्या ताब्यात नाही, असे  वक्तव्य का केलं? पंतप्रधान यांनी विचारपूस करुन केलं की ते त्यांचं वक्तव्य होतं?”, असे प्रश्न त्यांनी मोदींना विचारले. याशिवाय “सॅटेलाईटचे फोटो आणि इतर माहितींनुसार पंतप्रधान मोदींनी केलेला दावा साफ खोटा हे स्पष्ट झालं आहे. त्यावर प्रतिक्रया मिळणार आहे का?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.