पवारांच्या भूमिकेने सर्वांचीच अडचण, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसही बुचकळ्यात, सत्ताचक्राच्या केंद्रस्थानी एकमेव शरद पवार!

| Updated on: Nov 06, 2019 | 1:27 PM

शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आजच्या पत्रकार परिषदेतही शरद पवारांनी आपण विरोधी पक्ष म्हणूनच जबाबदारी पार पाडणार असल्याचं म्हटलं.

पवारांच्या भूमिकेने सर्वांचीच अडचण, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसही बुचकळ्यात, सत्ताचक्राच्या केंद्रस्थानी एकमेव शरद पवार!
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात सर्वाधिक चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar role in Maharashtra Government formation ) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या पवारांच्या पत्रकार परिषदेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं होतं. कारण शरद पवारांच्या भूमिकेने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली आहे.

शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं. पवार-सोनिया गांधी यांची भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं पुढे आलं. मात्र सोनिया गांधींनी अद्याप आपला निर्णय दिला नाही. त्यामुळे पवार नेमकी काय भूमिका घेणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आजच्या पत्रकार परिषदेतही शरद पवारांनी आपण विरोधी पक्ष म्हणूनच जबाबदारी पार पाडणार असल्याचं म्हटलं.

पवारांच्या भूमिकेने सर्वांचीच अडचण

पहिली अडचण भाजपची

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या आहेत. मात्र तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्ट्रवादी सत्तास्थापनेच्या आखाड्यात चर्चेत आहे. त्यामुळे 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची अडचण पवार ठरत आहेत. कारण जर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर भाजपच्या सत्तास्थापनेत अडथळा येऊ शकतो.

शिवसेनेची अडचण

शिवसेना सुरुवातीपासून मुख्यमंत्रिपदावर दावा करत, भाजपशी दोन हात करत आहे. त्याशिवाय संजय राऊत यांनी आमच्याकडे पर्याय असल्याचं म्हणत 175 इतकं संख्याबळ असल्याचा दावा केला. शिवसेना सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पर्याय पाहून, भाजपकडून महत्त्वाची खाती घेण्याच्या विचारात आहे. मात्र शरद पवारांनी शिवसेनेला थेट विरोध केला तर सेनेची अडचण होईल. इतकंच नाही तर राष्ट्रवादीने 2014 प्रमाणे जर भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला, तर शिवसेनेच्या हाती काहीच उरणार नाही.

काँग्रेसची अडचण

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.

जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा द्यायचं ठरवलं, म्हणजेच बहुमत चाचणीवेळी जर गैरहजर राहायचं ठरवलं, तरी मोठी अडचण होणार आहे. कारण काँग्रेसकडे 44 आमदारांचं संख्याबळ आहे. जर काँग्रेसचे आमदार बहुमतावेळी गैरहजर राहिले तर 288 वजा 44 म्हणजे 244 वर सदस्यसंख्या येईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 145 वरुन 123 वर येईल. मात्र शिवसेना+ राष्ट्रावादीचे 56 + 8 अपक्ष + राष्ट्रवादीचे 54 यांचं संख्याबळ 118 पर्यंत पोहोचतं. पण भाजप आणि मित्रपक्षांची संख्या 121 पर्यंत जाते. त्यामुळे काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुमत चाचणीवेळी गैर राहणंही अडचणीचे आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा देणेही अडचण आणि गैर राहून बाहेरुन पाठिंबा देणेही अडचणीचे आहे.