शिवसेना आणि भाजप आमदारांची सभागृहात हाणामारी, मध्यस्थीसाठी दिग्गज धावले

| Updated on: Dec 17, 2019 | 12:22 PM

सभागृहातही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली.

शिवसेना आणि भाजप आमदारांची सभागृहात हाणामारी, मध्यस्थीसाठी दिग्गज धावले
Follow us on

नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार राडेबाजी (Shiv Sena BJP MLA fight) पाहायला मिळत आहे. भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Shiv Sena BJP MLA fight) मुद्द्यावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली. भाजपने सामनातील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली.

महत्त्वाचं म्हणजे सभागृहातही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली.

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.

भाजपच्या आमदारांनी आज सकाळपासूनच शेतकरी मदतीवरुन आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी करताना, अनेक चिमटे काढले. यादरम्यानच, तिकडे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाली.

सभागृहातील प्रकार अशोभनीय : विधानसभा अध्यक्ष

सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणं चुकीचं आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

वेलमध्ये येणे नियमित : देवेंद्र फडणवीस

वेलमध्ये येणे हे आपल्या इथे नियमित आहे. नेहमीचे आहे. काही नवीन सदस्य आहेत. पण तरीही वेलमध्ये आलो तर विरोधी पक्ष संयम राखेल. कोणीही कोणाच्या अंगावर जाणार नाही. या  सभागृहातील अधिकाराचा आम्ही योग्य वापर करु. यापूर्वी विरोधी पक्ष आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून बॅनर फाडणे असे कधीही केले नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सामना हातात घेऊन भाजपचं आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली. पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला. भाजपने सामनातील बातमी दाखवत आंदोलन केलं.