Uddhav Thackeray : धन्यवाद, धनुष्यबाण आणि शिवसेना! उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत 3 मोठे मुद्दे
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री निवासस्थानावरून आज माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविषयी (Aditya Thackeray) प्रेम दाखवणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी प्रेम किती खरं आहे, याचीच शंकाच येतेय, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण (Dhanushyaban) हे चिन्ह घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असला तरीही शिवसेना कुणीही चोरून नेऊ शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचंच असेल. घटनातज्ज्ञांशी बोलूनच मी सांगतोय, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसंच शिवसेनेतून काही लोक निघून गेले असले तरीही अजूनही असंख्य साधी माणसं शिवसेनेत आहेत. या साध्या माणसांच्या जोरावरच शिवसेना मोठी होईल आणि देशभर पसरेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी माध्यमांशी साधलेल्या संवादातील तीन प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे-
1- आदर आहे मग तेव्हा गप्प का?
मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे, असं म्हणणाऱ्या शिंदे गटातील आमदारांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सूरतेला जाऊन बोलण्यापेक्षा सूरत दाखवून बोलला असतात तर बरं झालं असतं. मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल त्यांना प्रेम आहे, याबद्दल मी आभार मानतो. हे प्रेम जे आता दाखवत आहात. पण जे लोक मागील अडीच वर्षात जे माझ्याविरुद्ध बोलत होते, तेव्हा दातखिळी का बसली होती. आम्हाला आजपर्यंत कुणाला बोलण्याची हिंमत नव्हती. अशा अत्यंत विकृत टीका केली. ज्यांनी टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यांना मिठ्या मारत आहात. मग हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे? ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता. अशा लोकांसोबत तुम्ही आहात. त्यामुळे हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या.’
2. पक्ष चिन्ह बदलण्याचा विचार नाही
एकनाथ शिंदे यांचा गट दोन तृतीयांश आमदारांचं संख्याबळ बाळगून आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरही ते दावा करत आहेत. यामुळे शिवसेनेचं मूळ चिन्हच गमावेल का, अशी भीती आहे. यावर उद्धव ठाकरेंनी आज स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ‘आमदार जाऊ शकतात. पक्ष जाऊ शकत नाही. हा संभ्रम निर्माण केला जातोय. विधीमंडळ पक्ष वेगळा असतो आणि पक्ष वेगळा असतो. सगळ्यांनाच पैशाची अमिषं किंवा दमदाट्या करून नेऊ शकत नाही. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे, शिवसेनेकडेच राहील. घटनातज्ज्ञांशी बोलून मी बोलतोय. कैलास पाटील, नितीन आमच्याकडे आहेत. त्यांना धमक्या दिल्या. पण ते पर्वा न करता आमच्यासोबत आहेत. अशा जिगिरीचं माणसं असल्यामुळे आम्ही टिकणार’.
3. हिंमत असेल तर निवडणुका घ्या…
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली? जी गोष्ट दिलदारपणे व्हायला पाहिजे, ती अशी लपवून का केली? विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असेल. तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो. त्यांच्या डोळ्यातले अश्रूचे मोल मला जास्त आहेत. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेला दृष्टीहीन महाराष्ट्र आहे. जनतेला एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय. शिवसेनेनं एवढं मोठं पद दिल्यावरही अशी माणसं का वागत आहेत, याचं उत्तर द्यावं लागेल. सर्वसामान्य जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
