Sanjay Raut: शिवसेना म्हटलं की मोदी, शहाही रस्ता बदलतात, संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव

Sanjay Raut: शिवसेनेने अनेकांना मोठं केलं. बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे म्हटल्यावर लोक घाबरतात. आम्हाला पाहिल्यावर मोदी आणि शहा रस्ता बदलतात. यांच्या नादाला लागू नका म्हणतात.

Sanjay Raut: शिवसेना म्हटलं की मोदी, शहाही रस्ता बदलतात, संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2022 | 1:42 PM

मुंबई: बाळासाहेबांचे शाप ज्यांनी घेतले ते संपले. एका बापाचे असाल तर राजीनामा द्या आणि समोर या. एकातही राजीनामा देऊन समोर येण्याची हिंमत नाही. आमच्या नजरेला नजर मिळवण्याची त्यांच्यात हिंमत नाही. कारण ही शिवसेना (shivsena) आहे. अनेक विष पचवून उभी राहिलेली ही शिवसेना आहे. कुणालाही न घाबरणारे हे वाघ आहेत. बाळासाहेबांचे वाघ आहेत. शिवसैनिकाला पाहिल्यावर मोदी आणि शहाही रस्ता बदलतात ही शिवसेनेची ताकद आहे, असं सांगतानाच भाजपला (bjp) महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. महाराष्ट्राला तीन भागात वाटायचे आहे. त्याला शिवसेना विरोध करेल म्हणून शिवसेनेत फूट पाडली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला. दहिसरमध्ये शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर आणि बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली.

शिवसेनेने अनेकांना मोठं केलं. बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे म्हटल्यावर लोक घाबरतात. आम्हाला पाहिल्यावर मोदी आणि शहा रस्ता बदलतात. यांच्या नादाला लागू नका म्हणतात. कुणाची हिंमत नाही आमच्या दंडाला हात लावण्याची, याच्या नादाला लागू नका म्हणतात हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. याच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल. अशीही शिवसेना आहे, असं संजय राऊत म्हणाले.

बाप चोरता येत नाही

ही शिवसेना आहे लक्षात घ्या. शिवसेनेला एकच बाप आहे. कुणाला बाप चोरता येत नाहीत. पण बंडखोरांना एक बाप नाहीये. त्यांचे दिल्लीत चार बाप आहेत. गुजरातला गेले तिकडे तीन बाप. गुवाहाटीमध्ये तीन बाप पाहिले. मुंबईतून तीन चार बाप आहेत. मराठीत या लोकांसाठी एक शब्द आहे. तो वापरला तर मी शिवराळ आहे असं म्हणाल. पण भाषाच तशी आहे. म्हणून तो शब्द वापरावा लागतोय. यांचे 30 ते 35 बाप आहेत. हे अक्करमाशी आहेत. अक्करमाश्यांना समाजात प्रतिष्ठा नसते, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

आता तुमच्यावर विष खाण्याची वेळ

शिवसेना ही 56 वर्षाची अशी चिरतरुण आहे. अजिंक्य आहे. या शिवसेनेला मरण नाही. शंकराने हालाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला. त्यातून निर्माण झालेली ही शिवसेना आहे. आम्ही सर्व पचवायला तयार आहोत. आम्ही विष किती वेळा पचवलंय. आता तुमच्यावर वेळ आहे विष खाऊन मरण्याची, अशी टीकाही त्यांनी केली.

हिंमत असेल तर राजीनामा द्या

ही मुंबई महापालिका हातून काढण्यासाठी डाव सुरू आहे. ठाणे महापालिका आपल्या हातातून काढण्यासाठीचं हे मोठं कारस्थान आहे. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. घराघरात शिवसेना आहे. मनामनात शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे लोकांच्या मेंदूत आहेत. बाळासाहेबांनी काय दिलं नाही आपल्याला? ज्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली तो संपला. ज्याने बाळासाहेबांचे शाप घेतला ते संपले. एका बापाचे असाल तर राजीनामा द्या. आमच्या नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिंमत नाही, असं आव्हानच त्यांनी दिलं.

शिवसेना तोडायची आहे

महाराष्ट्र त्यांना अखंड ठेवायचा नाही. तीन भागात त्यांना महाराष्ट्र करायचा आहे. विदर्भ त्यांना वेगळा करायचा आहे. मराठवाडा-उत्तर महाराष्ट्र नावाचं एक राज्य करायचं आहे. मुंबई केंद्रशासित करायची आहे. या सर्वांना शिवसेना प्राणपणाने विरोध करेल म्हणून त्यांना शिवसेना तोडायची आहे. शिवसेना खतम करायची आहे, असा दावाही त्यांनी केला.

Follow Us