Vinayak Raut : स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का?; विनायक राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Vinayak Raut : खासदार विनायक राऊत उद्यापासून तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

Vinayak Raut : स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का?; विनायक राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 6:12 PM

रत्नागिरी: शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्हाला निवडणुक आयोगाला आमची निष्ठा दाखवायची आहे. म्हणून आम्ही प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहोत. आज तरी गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. उद्या जनमाणसाचा विचार करू. शिंदे यांच्या विद्वत्तेबाबत संशोधन करावं लागेल. कुणी तरी लिहून द्यायचे आणि त्यांनी ट्विट करायचे हे आम्हाला माहीत नाही का? त्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का? मला त्यांच्या विद्वत्तेचा अभ्यास करावा लागेल, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. आमदारकीसाठी एकनाथ शिंदे यांचे नावं पुढे करणे ही माझी चूक होती. चुकांसाठी आम्ही जबाबदार आहोत, उद्धव ठाकरे (uddhav thackeray) नाहीत, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली.

खासदार विनायक राऊत उद्यापासून तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली. शिवसेनेच्या आमदारांची खरेदी विक्री करण्यात आली. काही लोक आपलं मंत्रिपद टिकवण्यासाठी शिंदेंसोबत गेले, असा टोला राऊत यांनी उदय सामंत यांना लगावला. तुम्ही कुठेही जा, आम्ही सेनेत राहणार आहोत, असं काही शिवसैनिकांनी सामंत यांच्या घरी जाऊन साांगितल्याचंही राऊत म्हणाले.

मध्यावधी निवडणुका घ्याच

येत्या 10 जुलै रोजी शिवसेनेचा रत्नागिरी येथे निर्धार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. शिवसेनेची ताकद आम्ही पुन्हा एकदा दाखवून देऊ. तुम्ही लोकप्रतिनिधी विकत घ्याल. पण शिवसैनिक विकत घेता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची हौस तात्पुरती भागवली गेली आहे. सेनेचा पाया अद्याप मजबूत आहे. भाजपने देशाच्या संविधानाचा चोळामोळा करण्याचे काम सुरू केलं आहे, असं सांगतानाच फोडाफोडी कसली करता, हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, असं आवाहनच त्यांनी शिंदे यांना दिलं.

काहींच्या पीएला ईडीची नोटीस

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येणार होतं. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चाही केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अन्नावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि निघून गेले. हा सारा ईडीचा खेळ आहे. पैशाचा खेळ आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 71 पैकी 60 जणांना ईडीचा त्रास होता. ज्यांना इमान विकायचे आहे, त्यांनी विकावे. काही जणांच्या पीएला ईडीने नोटीस दिली होती. त्यानंतर हा खेळ झाल्याचा दावाही त्यांनी केला.

हिंमत असेल तर सेना सोडा

सत्तेचा दुरुपयोग करून सध्या शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरू आहे. स्थानिक पातळीवर आघाडीबाबत पदाधिकारी निर्णय घेतील. गुलाबराव यांच्या बापजाद्याने धनुष्यबाण निर्माण केला नाही. हिंमत असेल तर सेना सोडली हे जाहीर करा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

आघाडीचा निर्णय योग्यच

भाजपने त्रास दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आघाडीचा निर्णय योग्यच होता. रत्नागिरी जिल्ह्याची मुळीच चिंता नाही. भास्कर जाधव, वैभव नाईक आणि राजन साळवी यांच्यावर दबाव टाकण्याचे काम, सुरू आहे. सेनेच्या जिल्हा प्रमुखांना लालूच दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us