काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त साताऱ्याची तयारी, युतीची मतदारसंघनिहाय विजयाची रणनिती

| Updated on: Aug 31, 2019 | 10:50 PM

गेल्या दहा वर्षांपासून आमदार असलेल्या गोरेंनी दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जात असल्याचं सांगितलं. शनिवारी त्यांचा भाजपात प्रवेश होईल. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजप उमेदवाराला मदत (Satara assembly seats) केली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त साताऱ्याची तयारी, युतीची मतदारसंघनिहाय विजयाची रणनिती
Follow us on

सातारा : भाजप आणि शिवसेनेने मतदारसंघनिहाय विजयाची तयारी (Satara assembly seats) केल्याचं दिसत आहे. भाजपकडून सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का देण्यात आलाय. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. गेल्या दहा वर्षांपासून आमदार असलेल्या गोरेंनी दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जात असल्याचं सांगितलं. शनिवारी त्यांचा भाजपात प्रवेश होईल. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजप उमेदवाराला मदत (Satara assembly seats) केली होती.

माण-खटाव तालुक्यातून गेली 10 वर्षे एकदा अपक्ष, तर एकदा काँग्रेसमधून जयकुमार गोरे निवडून आले. या दुष्काळी पट्टयातील राजकारण हे पाणीप्रश्नावर कायम तापलेलं पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षात माण-खटावच्या 64 गावांचा न मिटलेला पाणी प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसात सोडवल्याने जनतेच्या पाणी प्रश्नासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगत आघाडीने सरकारने या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजप-शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त वाटचाल

सातारा जिल्हा हा कायम काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. सातारा जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकूण 8 विधानसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादीचे 05, काँग्रेसचे 02 आणि शिवसेना 01 असं संख्याबळ होतं. पण सध्या राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश (Satara assembly seats) केलाय, तर काँग्रेसचे जयकुमार गोरे भाजपात जाणार आहेत. याशिवाय फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दिपक चव्हाण यांची भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल, असं बोललं जातंय. कारण, रामराजेंनी अगोदरच राष्ट्रवादी सोडण्याची तयारी दाखवली आहे.

विधानसभेच्या 8 मतदारसंघांचं आगामी समीकरण

कराड दक्षिणचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यावेळीही खिंड लढवण्याची शक्यता आहे. पण त्यांच्याविरोधात भाजपकडून पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या रुपाने तगडं आव्हान निर्माण करण्याचीही रणनिती आखल्याची माहिती आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे.

कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कायम राहण्याची दाट शक्यता आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने इथे मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

वाई मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले हे भाजपात गेले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

कोरेगावचा गड आमदार शशिकांत शिंदे हे अजूनपर्यंत लढवत आहेत. जिल्ह्याची राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्यावरच येणार आहे. युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेही लढत प्रतिष्ठेची करणार आहे. तर भाजपचीही लढण्याची तयारी आहे.

फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दिपक चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची असेल. रामराजे काय भूमिका घेतात यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी अगोदरच भाजपात प्रवेश केलाय, तर पाटण मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराजे देसाईंचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

उदयनराजे भोसलेंचा भाजप प्रवेश निश्चित

खासदार उदयनराजे भोसले यांच्या रुपाने राष्ट्रवादीला तगडा नेता मिळाला आणि हमखास निवडून येणारा उमेदवार अशी ओळख झाली. पण उदयनराजे भाजपात येणार असल्याचं खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच सांगितलंय. उदयनराजेंचा पक्षप्रवेश दिल्लीत होणार आहे. पण हा प्रवेश नेमका कधी होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. येत्या दोन दिवसात हा प्रवेश होणार असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.