काँग्रेसच्या CAA विरोधातील बैठकीला जायचं की नाही, शिवसेनेत संभ्रम?

| Updated on: Jan 13, 2020 | 6:29 PM

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) विरोधीपक्षांनी देशभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. या विरोधात अधिकाधिक पक्षांना सहभागी करुन घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत (Meeting of Congress against CAA).

काँग्रेसच्या CAA विरोधातील बैठकीला जायचं की नाही, शिवसेनेत संभ्रम?
Follow us on

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) विरोधीपक्षांनी देशभरात आक्रमक भूमिका घेतली आहे. या विरोधात अधिकाधिक पक्षांना सहभागी करुन घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत (Meeting of Congress against CAA). महाराष्ट्रात देखील शिवसेनेला सोबत घेण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र, शिवसेनेत काँग्रेससोबत जायचं की नाही यावरुन काहीसा संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने CAA विरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजिक केली. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण होते, मात्र शिवसेनेकडून बैठकीला कुणीही हजर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Meeting of Congress against CAA).

काँग्रेस CAA विरोधात विरोधीपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्रात त्यांना आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेणे कठीण जात असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने CAA विरोधात बैठक आयोजित केली. याला उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं. मात्र, शिवसेनेत या बैठकीत सहभागी व्हायचं की नाही यावरुन संभ्रम असल्याने कुणीही सहभागी झालं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेसकडून CAA विरोधात आघाडी उघडण्यासाठी देशभरात यावर काय वातावरण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी सर्व मित्रपक्षांना सोबत घेतलं जात आहे. त्यासाठी आज (13 जानेवारी) बैठकीचंही आयोजन करण्यात आलं. दुसरीकडे महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला साथ दिल्यानंतरही शिवसेनेने या बैठकीला गैरहजेरी लावली. यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी देखील हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसकडून बैठकीचं निमंत्रण असतानाही शिवसेनेचा एकही नेता दिल्लीत नव्हता. यावर शिवसेनेचे लोकसभा गटनेते विनायक राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. या बैठकीला काँग्रेसकडून बैठकीचं आमंत्रण नसल्याची माहिती राऊत यांनी दिली. मात्र, काँग्रसमधील सूत्रांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिल्याचा दावा केला आहे.

दिल्लीत काँग्रेसने आपले सरकार असलेल्या राज्यांमध्ये CAA ची अंमलबजावणी न करण्याचा ठराव मंजूर केलाय. महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेठी आग्रही आहेत. यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेवर दबाव असल्याचंही बोललं जात आहे. शिवसेनेची भूमिका यावर वेगवेगळी राहिली आहे. आधी शिवसेनेने या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला. मात्र, नंतर राज्यसभेत विरोध करत सभात्याग केला. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी CAA च्या विरोधात सार्वजनिक मंचावर भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचा CAA विरोधी सूर वेळोवेळी दिसत राहिला आहे. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना CAA ची अंमलबजावणी करायची की नाही यावर कसरत करावी लागणार असल्याचं दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडून विधी आणि न्याय विभागाचं मतही जाणून घेतलं जात आहे.