कोकणात शिवसेनेला मोठा झटका; पक्षातंर्गत वादामुळे उपजिल्हा प्रमुख काँग्रेसमध्ये जाणार

| Updated on: Nov 23, 2020 | 8:57 PM

2014च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्यासारख्या तगड्या नेत्याचे आव्हान असताना वैभव नाईक निवडून आले होते. या विजयात अभय शिरसाट यांची महत्वाची भूमिका होती. | Abhay Shirsat

कोकणात शिवसेनेला मोठा झटका; पक्षातंर्गत वादामुळे उपजिल्हा प्रमुख काँग्रेसमध्ये जाणार
Follow us on

सिंधुदुर्ग: अंतर्गत कुरबुरींचे ग्रहण लागलेल्या महाविकास आघाडीत आता कोकणात नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट (Abhay Shirsat) हे पक्षांतर्गत वादांमुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी कुडाळ जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस (Congress) यावर काय तोडगा काढणार, हे पाहावे लागेल. (Shivsena leader Abhay Shirsat will join congress soon)

अभय शिरसाट हे गेल्या पाच वर्षांपासून पक्षात दुर्लक्षित होते. आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला ते कंटाळले होते. त्यामुळेच आता अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आज मंत्रालयात अभय शिरसाट यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, उपाध्यक्ष विजय प्रभू, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसमधील प्रवेशासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अभय शिरसाट यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

2014च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्यासारख्या तगड्या नेत्याचे आव्हान असताना वैभव नाईक निवडून आले होते. या विजयात अभय शिरसाट यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षाने त्यांना अडगळीत टाकल्याने अभय शिरसाट यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात राणे कुटुंबीयांकडून शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. अशावेळी कोकणातील वाढती नाराजी शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरु शकते. काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर यांनीही पक्षनेतृत्त्वाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे सांगत जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखविली होती.

यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये केसरकर गृह राज्यमंत्री होते. मात्र, महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते. दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकरांच्या नाराजीची चर्चा

(Shivsena leader Abhay Shirsat will join congress soon)