शरद पवारांना कान पकडण्याचा अधिकार, पार्थ पवारांवरुन नाहक राजकारण : गुलाबराव पाटील

| Updated on: Aug 15, 2020 | 4:17 PM

महाविकासआघाडीचे सरकार पडणार म्हणजे भाजपचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत, असेही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil Comment On Parth Pawar) म्हणाले.

शरद पवारांना कान पकडण्याचा अधिकार, पार्थ पवारांवरुन नाहक राजकारण : गुलाबराव पाटील
Follow us on

जळगाव : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या वादावरुन नाहक राजकारण सुरू आहे. शेवटी शरद पवार हे सर्वेसर्वा आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकारणाच्या पलीकडे नाते आहेत. आजोबा म्हणून त्यांचा कान पकडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर होणारी टीका चुकीची आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच महाविकासआघाडीचे सरकार पडणार म्हणजे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. (Gulabrao Patil Comment On Parth Pawar)

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपकडून महाविकासआघाडी सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर आपली मते मांडली.

आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपचा केविलवाणा प्रयत्न

भाजपच्या सरकार कोसळणार असल्याच्या टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. गुलाबराव पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा हा दावा सुरू आहे.”

“राजस्थानचे सरकार पडणार अशी चर्चा होती. राजस्थानचे सरकार आम्ही पाडू, असा दावा भाजपने केला होता. मात्र, आपण पाहिले की राजस्थानच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थानचे बहुमत पाहिले तर ते अवघे 10 ते 20 मतांचे होते. आपल्याकडे 170 आमदार एकत्र आहेत. म्हणजेच सरकार पडणार हे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत.”

“आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा प्रकारची लालसा भाजप आपल्या आमदारांना दाखवत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे सुरळीतपणे चालणार आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले. (Gulabrao Patil Comment On Parth Pawar)

अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया

राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात काहीही गैर नाही. मागे पाच वर्षे त्यांचेही सरकार होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो. तेव्हाही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तेव्हा तर एकाच महिन्यात दोन-दोन, तीन-तीन बदल्या झालेल्या मी पाहिल्या आहेत.”

“जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी. त्यात किती गैरप्रकार झाले आहेत, ते लक्षात येईल ना? मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंत्री होते. त्यांनी केलेला हा आरोप म्हणजे सरकारला तसेच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.”

शिवसेना-राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाही 

“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतीतही त्यांना हे पद दिले म्हणून टीका सुरू आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहारची जबाबदारी दिली म्हणून आम्ही काय त्यांना ‘ही’ जबाबदारी दिली म्हणतोय का? ज्या व्यक्तीमध्ये जी क्षमता असते, त्यानुसार पक्ष जबाबदारी देत असतो. मात्र, आदित्य ठाकरे हे ठाकरे असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत,” असे यांनी सांगितले. (Gulabrao Patil Comment On Parth Pawar)

संबंधित बातम्या : 

पवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील : राजेश टोपे

पार्थ ‘सहयोग’ करणार? श्रीनिवास पवारांच्या घरी स्नेहभोजन, काका-काकी पार्थ पवारांची समजूत काढण्याची चिन्हं