राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे (Shivsena MP Sanjay Jadhav resign).

राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा
| Updated on: Aug 26, 2020 | 6:19 PM

परभणी : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे (Shivsena MP Sanjay Jadhav resign). त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. त्यांनी राजीनाम्यासोबतच एक पत्रदेखील पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले आहेत.

“स्थानिक शिवसैनिकांच्या इच्छा आपण पूर्ण करु शकत नसलो, आपल्या कार्यकर्त्यांना योग्यपणे न्याय देता येत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही”, अशी भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.

खासदार संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाले?

“जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील 8 ते 10 महिन्यांपासून आपल्याकडे पाठपुरावा करीत आलो आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी कशी-बशी समजूत काढून तथा मी ही शांत बसलो”, असं संजय जाधव पत्रात म्हणाले.

“दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसेनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून मी आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा मसा मुळीच नैतिक अधिकार नाही, असे मला वाटते”, असं संजय जाधव म्हणाले.

हेही वाचा : Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे धडाकेबाज महापालिका आयुक्त आता मुंबईत!

“शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा कार्यकर्त्याला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची? खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही. या मताचा मी आहे. शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल?”, असा सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केला.

“जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. मात्र, मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणून काय न्याय देऊ शकेल? असा प्रश्न मला पडला आहे”, असं मत संजय जाधव यांनी पत्रात मांडलं.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत पाठपुरावा करुनही दुसऱ्यांदाही राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने शिवसैनिकांवर पुन:च्छ अन्याय झाला आहे. ही बाब माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहे. खासदाक म्हणून मी जर कार्यकर्त्यांना न्याय देत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. तेव्हा पूर्ण विचारांती आणि राजखुशीने मी खासदार पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेन. तरी माझा खासदारकीचा राजीनामा मंजूर करावा, ही विनंती”, असं संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवेलल्या पत्रात म्हणाले आहेत.

Follow Us