महाराष्ट्र संतापला, खवळलेलाय, ‘बंद’ च्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?

| Updated on: Nov 28, 2022 | 11:26 AM

छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या मातीचा अपमान आहे. त्यामुळे तो आम्ही सहन करणार नाहीत,असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र संतापला, खवळलेलाय, बंद च्या भूमिकेवर संजय राऊत काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा भाजपच्या (BJP) आराध्य दैवतांकडून ज्या पद्धतीने अपमान होतोय… त्यानंतर माफीदेखील मागण्यात येत नाहीये. याउलट आम्हालाच शहाणपण शिकवलं जातंय.. या प्रकारामुळे महाराष्ट्र संतापला आहे. खवळला आहे. याचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात सगळेच पक्ष एकत्र आले असून महाराष्ट्र बंदचा निर्णय कोणत्याही क्षणी होऊ शकतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आज चर्चा करणार असल्याची महत्त्वाची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राज्यपालांचा निषेध करताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतरही हे सरकार मुठी आवळून उसळून निघत नाहीत?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे पाऊलं उचलायची आहेत, ती लवकरच उचलत आहोत…

राज्यपालांविरोधात छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका लोकभावना असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्यपालांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील, ते आम्ही उधळून लावू, असं उदयनराजे म्हणाले होते.

नेहरूंनीही माफी मागितली होती..

महाराष्ट्राने अजून संयम राखला आहे. भाजपाकडून राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांचा बचाव केला जातोय, असं कधी घडलं नव्हतं. पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. त्यावेळी पंतप्रधान असतानाही त्यांनी माफी मागितली होती. मोरार्जी देसाई एवढे मोठे नेते होते. त्यांच्याकडूनही चुकीची विधानं झाली होती. त्यांनीही माफी मागितली होती.

‘पण भाजपाचे टगे…’

महान नेत्यांनी माफी मागितली होती, पण भाजपचे टगे शिवाजी महाराजांचा अपमान करून इतरांना शहाणपण शिकवतायत. त्यामुळे महाराष्ट्र संतापलेला आहे. आतून खवळलेला आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारला इशारा दिला आहे.

राज्यपालांविरोधात सगळेच पक्ष एकत्र आहेत. शिवसेना सगळ्यात पुढे असली तरी छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या मातीचा अपमान आहे. त्यामुळे तो आम्ही सहन करणार नाहीत. या वक्तव्यावर सगळेच पक्ष एकत्र आहेत, असे संजय राऊत म्हणाले.