मेहबूबा मुफ्तींसोबतची भाजपची युती ‘लव जिहाद’ होता का? शिवसेनेचा भाजपला सवाल

| Updated on: Nov 11, 2019 | 5:50 PM

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेण्यासाठी हालचाली करत आहे. त्यावर भाजपने विचारधारेचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.

मेहबूबा मुफ्तींसोबतची भाजपची युती लव जिहाद होता का? शिवसेनेचा भाजपला सवाल
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेण्यासाठी हालचाली करत आहे. त्यावर भाजपने विचारधारेचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Shivsena on BJP Mehbooba Mufti and Love Jihad) भाजपवर पलटवार केला आहे. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाशी युती केली. त्यांचीही विचारधारा एकमेकांच्याविरोधी होती. मग भाजपची ती युती लव जिहाद होता का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी (Shivsena on BJP Mehbooba Mufti and Love Jihad) विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले, “भाजपला प्रचंड अहंकार झाला आहे. त्यामुळेच ते मुद्दाम राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलत आहे. त्यांनी निवडणुकीआधी ठरवलेला सत्ताविभाजनाचा फॉर्म्युला नाकारुन जनतेचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईन. भाजप आम्ही कुणाशी युती करावी यावर बोलत आहे. मात्र, त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याशी जी युती केली मग ती युती काय लव जिहाद होता का?”

संजय राऊत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युतीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “दोन्ही पक्षांना आवाहन करेल. ही त्यांच्या परिक्षेची वेळ आहे. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना आमच्यासोबत मिळून सरकार स्थापन करायचे आहे. आम्ही ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर काम करत आहोत.“

भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे ते त्याचं खापर आमच्यावर फोडत आहेत. हे योग्य नाही. भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे. मात्र, त्यांना मित्रपक्षाशी ठरलेला 50-50 चा फॉर्म्युला पाळायचा नाही. हे द्वेषाचं राजकारण आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं.

राऊत म्हणाले, ‘खोटेपणा आणि अहंकार यामुळे राज्याची ही स्थिती झाली आहे. शिवसेना भाजपसोबत जात नाही अशी ते तक्रार करतात. मात्र, हा त्यांचा अहंकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी झाली असती, तर महाराष्ट्रात ही स्थिती झाली नसती. भाजपचा अहंकार म्हणजे जनतेचा अपमान आहे.’

विशेष म्हणजे अरविंद सावंत यांनी आपला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रासाठी ही दुर्दैव आहे.’