“अन्यायाविरुद्ध मर्दासारखं लढायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

| Updated on: Jun 22, 2021 | 6:38 AM

अन्यायाविरुद्ध मर्दासारखं लढत राहायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा, असं सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांनी म्हटलं आहे. (Shivsena Sanjay Raut Saamana Editorial Over pratap Sarnaik Letter bomb)

अन्यायाविरुद्ध मर्दासारखं लढायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा
प्रताप सरनाईक आणि संजय राऊत
Follow us on

मुंबई :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलं. या पत्रातून भाजपबरोबर पुन्हा युती करण्यापासून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा नाहक होत असलेल्या त्रास, इथपर्यंत भाष्य केलं. या पत्रातून त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर सविस्तर भाष्य करत शिवरायांच्या स्वराज्याची आठवण करुन देताना न्यायाविरुद्ध मर्दासारखं लढत राहायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा, असं म्हटलं आहे.(Shivsena Sanjay Raut Saamana Editorial Over Pratap Sarnaik Letter bomb)

शिवरायांच्या मावळ्यांनी विचार करावा

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा, असा विचार करायला लावणारा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

राऊतांनी करुन दिली शिवरायांच्या त्यागाची आठवण

“बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी ‘तह’ करून मांडलिकी पद्धतीने गुजराण करायची?”

“मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतले असते तर दऱ्याखोऱ्यांत भटकून लढाया करण्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले नसते. मोगल बादशहाने त्यांना एखादी मनसबदारी बहाल केली असती व इतर राजांप्रमाणे शिवरायांना त्यावर पिढ्यानं पिढ्या गुजराण करता आली असती; पण शिवरायांनी तसे केले असते तर इतिहासपुरुष, महान योद्धा, स्वाभिमान, अभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण आज जसे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो तसे झालो नसतो…”

शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे, असंही राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

(Shivsena Sanjay Raut Saamana Editorial Over Pratap Sarnaik Letter bomb)

हे ही वाचा :

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं