“भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय”

| Updated on: Aug 02, 2021 | 7:55 AM

भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटलंय.

भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय
संजय राऊत
Follow us on

मुंबई :  जसं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय, तसा शिवसेना-भाजपात कोणत्या ना कोणत्या विषयावरुन ‘सामना’ ठरलेला…. पण मूळचे भाजप नेते  शिवसेनेवर पातळी सोडून टीका करत नाहीत. भाजपात नव्याने आलेले नेते मात्र शिवसेनेवर, पक्षनेतृत्वावर, संजय राऊतांवर तुटून पडतायत. मग त्यामध्ये नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र, गोपीचंद पडळकर आणि आता प्रसाद लाड… याच नव्याने भाजपवासी झालेल्या नेत्यांमुळे मूळ लोक भंगारात गेली असल्याचं म्हणत भाजपचा अंतकाळ जवळ आल्याची भविष्यवाणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे. (Shivsena Sanjay Raut Slam New Comers leaders in BJP through Saamana Editorial)

भाजपात उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात

भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.

आपण किती निष्ठावान यासाठी प्रसंगी तो जिभेवाटे गटार मोकळे करतो

शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.

ही आडवाणी- वाजपेयींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय?

1992 च्या ‘बाबरी’ दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरुन घरातच गोधड्या भिजवत होते. ”आम्ही बाबरी पाडली नाही हो।।”, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करु पाहतात ही आडवाणी – अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय?

शिवसेना भवनाच्या मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही!

खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही.

जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उतमात केला, इतिहास समजून घ्या

जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उतमात केला. शिवतीर्थावरील एका सभेच्या निमित्ताने शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा इस्पितळात पोहोचली याचा इतिहास भाजपमधील बाटग्यांनी समजून घ्यावा. शिवसेना भवनाशी पंगा घेतल्याने त्यांचा तो जनता पक्ष भविष्यात औषधालाही शिल्लक राहिला नाही.

रजनी पटेलांचं शिवसेना भवनास टाळं लावण्याचं स्वप्न पण नंतर राजकारणातून कायमच्या नामशेष

रजनी पटेल हे महाशय आजच्या पिढीस माहीत नसतील, पण मुंबईच्या राजकारणात व दिल्लीतील काँग्रेस दरबारी त्यांचे भलतेच वजन होते. शिवसेना बरखास्त करून शिवसेना भवनास टाळे लावण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते रजनी पटेल राजकारणातून व सार्वजनिक जीवनातून कायमचे नामशेष झाले.

सेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणारे वरळीच्या गटारात वाहून गेले

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकड्या नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत.

(Shivsena Sanjay Raut Slam New Comers leaders in BJP through Saamana Editorial)

हे ही वाचा :

“सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या”

प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, संजय राऊतांनी 3 शब्दात इज्जत काढली

तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, शिवसेना खवळली

“बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण, जनता यांना निवडणुकीत भुईसपाट करणार”