राष्ट्रवादी विरोधात ‘नाराजी’नामा, जाहीर खटके उडाल्याने खदखद बाहेर?

| Updated on: Aug 27, 2020 | 12:21 AM

महाविकास आघाडीत आतापर्यंत नाराजी दिसून येत होती. पण आता जाहीरपणे खटके उघडताना दिसतायत (Differences in MahaVikasAghadi )

राष्ट्रवादी विरोधात नाराजीनामा, जाहीर खटके उडाल्याने खदखद बाहेर?
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीत आतापर्यंत नाराजी दिसून येत होती. पण आता जाहीरपणे खटके उघडताना दिसतायत (Differences in MahaVikasAghadi ). राष्ट्रवादी काँग्रेसवर गळचेपीचा आरोप करत शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाय. आपलंच सरकार असूनही न्याय मिळत नसेल, तर काय फायदा? असा सवाल करुन त्यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा पाठवलाय.

परभणीतील जिंतूर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रशासक मंडळाच्या नियुक्तीमुळं खासदार संजय जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. जाधव यांनी आपला राजीनामा थेट उद्धव ठाकरेंकडे पाठवलाय. यात त्यांनी राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर झालेली गळचेपी हे कारण सांगितलंय. जिंतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर दुसऱ्यांदा देखील राष्ट्रवादीचंच प्रशासक मंडळ नियुक्त झाल्यानं खासदार संजय जाधव संतप्त आहेत. त्या संतापातूनच त्यांनी थेट पक्षप्रमुखांना राजीनामा पाठवला.

खासदार संजय जाधव यांनी या पत्रात म्हटलंय, “जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील 8 ते 10 महिन्यांपासून आपल्याकडे पाठपुरावा करत आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादीचा आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय. त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून मी आपल्या कार्यकर्त्यांची कशी-बशी समजूत काढून संयम बाळगून शांत बसलो.”

“आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा मला मुळीच नैतिक अधिकार नाही. शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे,” असं मत संजय जाधव यांनी या पत्रात व्यक्त केलं.

आता शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रवादीचं कारण देऊन पक्षप्रमुखांकडे राजीनामा पाठवल्यानंतर विरोधकांकडेही टीकेची आयतीच संधी आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडीवर जोरदार टीका केली.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातील खदखद याआधीही समोर आलीय. 15 दिवसांआधीच शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादीची तक्रार केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं पटापट होतात, असा दावा सेना आमदारांनी केलाय. शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याची खंत आमदारांनी बैठकीत मांडली. आता तर राष्ट्रवादीकडून सुरु असलेल्या गळचेपीवरुन खासदार संजय जाधवांनीच उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिलाय.

महाविकास आघाडीत फक्त शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी नाराज आहेत असं नाही. तर काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केलीय. आमदारांच्या विकास निधीवरुन जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल उपोषणाच्या पवित्र्यात होते. मात्र अजित पवार यांनी समजूत काढली. पण खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी राष्ट्रवादीचं नाव न घेता, एका पक्षाच्या आमदारांना अधिक निधी मिळाल्याचं म्हटलंय.

आतापर्यंत महाविकास आघाडीत नाराजी नाट्य पाहिलं. पण आता खटके उडताना दिसतायत. शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचा राजीनामा हे त्याचंच उदाहरण असल्याचं बोललं जात आहे. पण महाविकास आघाडीसाठी हे संकेत अजिबात चांगले नसल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना

राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

संबंधित व्हिडीओ :