शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, कोणत्याही क्षणी गोड बातमी: सुधीर मुनगंटीवार

| Updated on: Nov 05, 2019 | 5:47 PM

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर बोलताना भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Government Formation) यांनी मोठा खुलासा गेला आहे.

शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, कोणत्याही क्षणी गोड बातमी: सुधीर मुनगंटीवार
Follow us on

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर बोलताना भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Government Formation) यांनी मोठा खुलासा गेला आहे. भाजपने शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. आता शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत. कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळू शकते, अशी माहिती मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Government Formation) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे हे प्रमुख नेते उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमचंच सरकार येणार आहे. आम्ही सर्व नियोजन केलं आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. सरकार बनवण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. भाजपने शिवसेनेला आपला प्रस्ताव पाठवला आहे. तो जाहीर सांगायचा नाही असं बैठकीत ठरलं आहे. आता शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहात आहे.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही.”

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 13 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) आहे.

भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.