बालेकिल्ल्यातील जागा राखण्यासाठी मुनगंटीवार विदर्भात तळ ठोकून

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

वर्धा : लोकसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर झाल्यापासून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वच मोठ्या जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मग ते निवडणुकांची रणनिती ठरवणे असो किंवा उमेदवार निवडणे. सर्वच नेते आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच राज्याचे अर्थमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी वर्ध्याची जागा भाजपलाच जिंकवून देण्याचा निर्धार केल्याचं […]

बालेकिल्ल्यातील जागा राखण्यासाठी मुनगंटीवार विदर्भात तळ ठोकून
Follow us on

वर्धा : लोकसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर झाल्यापासून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वच मोठ्या जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मग ते निवडणुकांची रणनिती ठरवणे असो किंवा उमेदवार निवडणे. सर्वच नेते आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच राज्याचे अर्थमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी वर्ध्याची जागा भाजपलाच जिंकवून देण्याचा निर्धार केल्याचं चित्र आहे. याला कारण म्हणजे, निवडणुका जाहीर झाल्यापासून मुनगंटीवार हे चंद्रपुरात कमी आणि वर्ध्यात जास्त दिसत आहेत.

वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन मतदारसंघाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच मुनगंटीवार हे वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे  लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून मुनगंटीवार हे वर्ध्यातच तळ ठोकून बसल्याचं चित्र आहे.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी वर्ध्यात तेली समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मेघेंना उमेदवारी दिल्यास मेघे पिता-पुत्रांचे पुतळे जाळण्याचा आक्रमक पवित्रा तेली समाजाने घेतला. यानंतर दत्ता मेघेही संतापले आणि वर्ध्यात तेली-कुणबी वाद पेटला. त्यानंतर भाजपने वर्ध्यातून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे नाराज दत्ता मेघे यांना समजावत पक्षात समन्वय टिकवून ठेवण्याचं काम मुनगंटीवारांकडे सोपवण्यात आलं. त्यासाठीच मुनगंटीवार सतत वर्ध्याला भेट देत असतात. कधी कार्यकर्त्यांची बैठक, कधी युतीची बैठक तर कधी मतदार संघाच्या विविध संघटनासोबत चर्चा. कुठल्या ना कुठल्या कारणाने मुनगंटीवार हे वर्ध्यात येत असतात. त्यामुळे मुनगंटीवार हे नेमके चंद्रपूरचे की, वर्ध्याचे असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षांकडून मुनगंटीवारांची खिल्ली उडवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक 2019 साठी वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस, काँग्रेसच्या चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी यांच्यात तिहेरी लढत रंगणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. मात्र, मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना वर्ध्यात यश मिळेल की नाही, हे तर निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मेला कळेल.