‘परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो’, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी

| Updated on: Mar 12, 2022 | 6:20 PM

'मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं मी भाजपमध्ये आलो', असं वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टोलेबाजीही केलीय. केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी
सुजय विखे पाटील यांचा काँग्रेसवर निशाणा
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचा आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) धुव्वा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मिश्किल टिप्पणी करत काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं मी भाजपमध्ये आलो’, असं वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टोलेबाजीही केलीय. केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष लाचार बनलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी होत आहे. काँग्रेसनं आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवी सुरुवात करावी, असा जोरदार टोला सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला लगावलाय. त्याचबरोबर शिवसेनेची स्पर्धा ही नोटाबरोबर असल्याचं गोवा आणि उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं. ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. जे प्रभारी राज्यात रोज बोलतात त्यांना पाहून गोव्याच्या जनतेनं त्यांना नाकारलं असल्याची खोचक टीका सुजय विखे यांनी शिवसेनेवर केलीय.

‘बोलघेवड्या माणसांना पुढं करुन पक्षाची अधोगती सुरु’

राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेची मंडळी आता करमणुकीचं साधन बनली आहेत. गोव्यात तुम्हाला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. बोलघेवड्या माणसांना पुढं करुन पक्षाची अधोगती होईल. भविश्यात शिवसेनेला कुणीही गांभीर्यानं घेणार नाही, अशी जोरदार टीका विखे-पाटील यांनी केलीय.

तर अदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याचा महसूल विभागाचा एकमेव धंदा बनलाय. बिल्डरांना जागा विकल्या जात आहेत. सरकारने कारवाई केली नाही तर कोर्टात जाणार, असा इशाराही राधाकृष्ण विखे यांनी दिलाय. तसंच राज्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरु आहे. सत्तेतील पक्ष स्वत:चं भलं करण्याच्या मागे लागले आहेत. राज्यातील जनतेशी त्यांना काही देणंघेणं नाही, अशी जोरदार टीका विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय.

भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल- आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यातील जनतेनं भाजपच्या बाजुने कौल दिलाय. 2024 ला महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे. शिवसेनेनं अजूनही भाजपसोबत यावं, असा सल्लाही आठवले यांनी दिलाय. तर काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट बनली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढेल असं दिसत नाही. पक्षांतर्गत वाद सुरु आहेत. गांधी परिवाराचं आकर्षण आता संपलंय. काँग्रेसनं गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचा सल्लाही आठवले यांनी काँग्रेसला दिलाय.

इतर बातम्या :

अधीर रंजन चौधरी म्हणाले ममता बॅनर्जी ‘पागल’! देशभरात काँग्रेसचे 700 आमदार असल्याचंही आवर्जून सांगितलं

धनंजय मुंडे म्हणतात कोण निलेश राणे? पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादी आक्रमक