अब्दुल भाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का?; सुषमा अंधारे सिल्लोडमध्ये जाऊन असं का म्हणाल्या?

सत्तर वर्षात तर काँग्रेसने काहीच केलं नाही ना? जो काही विकास केला तो तुम्हीच केला तर मग हे प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार कशी?

अब्दुल भाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का?; सुषमा अंधारे सिल्लोडमध्ये जाऊन असं का म्हणाल्या?
अब्दुल भाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का?; सुषमा अंधारे सिल्लोडमध्ये जाऊन असं का म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 20, 2022 | 9:57 AM

सिल्लोड: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे कृषी अब्दुल सत्तार यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात जाऊन जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुटीर आमदारांना घेऊन कामाख्या मंदिरात दर्शनाला गेले होते. त्यावेळी अब्दुल सत्तार कुठे होते? असा संतप्त सवाल करतानाच अब्दुल भाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

सिल्लोडमध्ये महाप्रबोधन यात्रेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी हा हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे आमच्या अब्दुल सत्तार भाईला गुवाहाटीला घेऊन गेले. तुम्ही कामाख्या मंदिरात गेला तेव्हा सत्तार भाई कुठे होते? सत्तार यांना इस्लाम कळतो का? अब्दुल भाई मी तुमचे इमान जागे करायला आले आहे; असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.

यावेळी सुषमा अंधारे यांनी सत्तार यांना इस्लाममधील पाच फर्ज समजावून सांगितले. अब्दुल भाई मी तुमची बहीण आहे आणि मी तुम्हाला रस्ता दाखवायला आले आहे. अब्दुल सत्तार यांनी अनेक पक्षाचे रुमाल बदलले. तुम्ही कपड्या सारखे पक्ष बदलले.

अब्दुल सत्तार यांना एका कट छक्का ही मटक्याचे भाषा कळते. त्यांना टू वनजा टू कळत नाही. कधी कधी संशय येतो की, अब्दुल भाई तुम्ही घरवलीचे तरी आहात का? असा सवाल त्यांनी केला.

अब्दुल भाई तुम्ही सुप्रिया सुळे यांच्या बद्दल बोलला. त्यावर तुमची त्यावरून लायकी ठरते. सुप्रिया सुळे यांना तुमच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाही. कधी कधी वाटतं देवेंद्र फडणवीस हे अब्दुल भाईंना ठरवून बोलायला सांगत असतील.

जे लोक आव्हाडांवर केस दाखल करतात, तेच लोक सत्तार आणि गुलाबरावांना गुळगुळीत भाषेत समजावतात यावरून या राज्यात काय चाललंय ते दिसून येतं, अशी खोचक टीका त्यांनी केली. तुम्ही पक्षाचे नाही, राज्याचे गृहमंत्री आहात हे देवेंद्र फडणवीस यांना कळत नाही का? असा सवालही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी महागाईचा मुद्दा हाती घेतला होता. आता मोदींना सांगावे वाटते, आता किती महागाई आहे? ठरवून सरकारी कंपन्या बंद पडण्याचे काम मोदींनी केले, असा आरोप त्यांनी केला.

काहीही झालं तर मोदी काँग्रेसवर खापर फोडायचे. गेल्या सत्तर वर्षात काहीच विकास झाला नाही. त्याला काँग्रेस जबाबदार आहे, असं मोदींपासून भाजपचा प्रत्येक नेता म्हणायचा. मग आता गुजरातला प्रकल्प गेल्यावर त्याचं खापर महाविकास आघाडीवर का फोडता?

सत्तर वर्षात तर काँग्रेसने काहीच केलं नाही ना? जो काही विकास केला तो तुम्हीच केला तर मग हे प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार कशी? असा सवाल करत त्यांनी शिंदे सरकार आणि भाजपची कोंडी केली.

अब्दुल भाई यांना खरच वाटत असेल तर ते हिंदुत्वासाठी आहे, तर सिल्लोडमधील समस्या का मार्गी लागत नाहीत. अब्दुल भाई डोक्यावरील गांधी टोपीचा तरी अपमान करू नका. अब्दुल सत्तार यांची खोट बोलण्याची फितरत आहे. तुमच्या सिल्लोडमध्ये येऊन मी एकटी बोलायला तयार आहे, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us