खडसे-पंकजा पराभवाने सैरभैर, ‘तरुण भारत’चा हल्लाबोल, ‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री’वरुनही टोले

| Updated on: Dec 14, 2019 | 11:04 AM

गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अयोग्य बोलले आहेत, असं म्हणत 'लोकांच्या मनातला मुख्यमंत्री' या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली.

खडसे-पंकजा पराभवाने सैरभैर, तरुण भारतचा हल्लाबोल, लोकांच्या मनातला मुख्यमंत्रीवरुनही टोले
Follow us on

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का? असा जळजळीत सवाल करत रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून खडसे-मुंडेंना लक्ष्य ( Tarun Bharat on Khadse Pankaja) करण्यात आलं आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता नागपूर तरुण भारत वृत्तपत्राच्या अग्रलेखातून दोघांचे कान टोचण्यात आले आहेत.

रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम ‘मूठभर’ लोकांचा झाला का? असा प्रश्न ‘तरुण भारत’मधून विचारण्यात आला आहे.

अहंकारामुळे आपल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करता येत नाही. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अहंकारी झाले आहेत. गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अयोग्य बोलले आहेत, असं म्हणत ‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री’ या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली.

VIDEO : खडसेंबाबत प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर हात जोडले

करण्यात आली आहे. नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, पंकजा मुंडे यांनीही तसंच मन बनवल्याची शक्यता आहे, एका पराभवाने पंकजा आणि एकनाथ खडसे सैरभैर झाले आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते, असेही अग्रलेखात ( Tarun Bharat on Khadse Pankaja) म्हटले आहे.