‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल’

| Updated on: Nov 18, 2020 | 11:25 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. | Sandeep Deshpande

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, हे माहिती असल्यामुळेच राज ठाकरे (Raj Thackeray) वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते, असा टोला ‘मनसे’कडून लगावण्यात आला आहे. (MNS leader sandeep Deshpande take a dig at CM Uddhav Thackeray and Sanjay Raut)

वाढीव वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा मिळेल, असे राज्य सरकार सुरुवातीला सांगत होते. मात्र, आता उर्जामंत्र्यांनी यू-टर्न घेत लोकांना वीजेची बिले भरावीच लागतील, असे जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता संजय राऊत यांना राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले, हे कळाले असावे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला.

कोरोनाच्या काळात अनेकांची कार्यालये बंद होती. मग वीज न वापरताही त्यांनी बिल का भरावे? जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यामुळे आता सरकारने जनक्षोभासाठी तयार राहावे, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे.

लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजेत. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले होते.

काय म्हणाले होते संजय राऊत?
काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वाढीव वीजदरांच्या प्रश्नावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला होता. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती.

संबंधित बातम्या:

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका

(MNS leader sandeep Deshpande take a dig at CM Uddhav Thackeray and Sanjay Raut)