IND vs SL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत खेळण्याबाबत शुबमन गिल स्पष्टच म्हणाला…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 पर्वातील भारत कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील चांगल्या कामगिरी दोन्ही संघांचं पुढचं गणित ठरणार आहे. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलने आपलं म्हणणं मांडलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे होत असून दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांची स्थिती जवळपास तशीच आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी या मालिकेत 2-0 ने विजय मिळवणं आवश्यक आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्याने श्रीलंका कसोटी मालिका किती महत्त्वाची आहे? याचा उल्लेख केला. श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकलो तर आणि तरच पुढचं गणित सुटू शकतं याची कल्पना कर्णधार शुबमन गिलला आहे. त्यामुळे त्याने पत्रकार परिषदेत याबाबत आपलं म्हणणं मांडलं.
शुबमन गिल काय म्हणाला?
शुबमन गिलने पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘मी कर्णधाराच्या भूमिकेत खूप समाधानी आहे. कसोटी चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहणे आमचं ध्येय आहे. यासाठी आम्हाला उर्वरित नऊ पैकी सात ते आठ कसोटी सामने जिंकावे लागतील. त्याची सुरूवात आम्हाला येथूनच करावी लागणार आहे.’ भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात विजय, चार सामन्यात पराभव आणि एक सामना अनिर्णित ठरला आहे. भारतीय संघ 48.15 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.
🗣️ The main goal is to play the World Test Championship Final#TeamIndia captain Shubman Gill talks about the progress of the team and the importance of the Sri Lanka Test series.#SLvIND | @ShubmanGill pic.twitter.com/qfSTwseB4d
— BCCI (@BCCI) August 14, 2026
भारतासाठी पहिला कसोटी सामना ऐतिहासिक
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियासाठी ऐतिहासिक असणार आहे. भारताचा हा 600वा कसोटी सामना असणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी हा सामना होत असल्याने त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. याबाबत शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या. शुबमन गिल म्हणाला की, ‘600व्या कसोटी सामन्यात माझ्या देशाचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. स्वातंत्र्यदिनी असं करणं हा त्याहूनही मोठा सन्मान आहे.’
