Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय अंतिम’, राज्यातील सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 28, 2022 | 6:32 PM

या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी असे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे. विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी धीर धरावा असेही सांगण्यात येते आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय अंतिम, राज्यातील सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. शिंदे गटाकडून उद्या बच्चू कडू यांच्यासह 10 आमदारांना मुंबईत पाठवलं जाणार असल्याचं कळतंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. अशावेळी आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

महाविकास आघाडीतील नेते, मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी या बैठकीत सर्व मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. तुम्ही जी भूमिका घ्याल ती मान्य असेल असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. सरकार-प्रशासन चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार सुरु आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न मानण्यात येतो आहे. राजीनाम्याची शक्यता कमी या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी असे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे. विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी धीर धरावा असंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे.

मुंबई बंडखोर येत नाहीत, तोपर्यंत सांगता येत नाही – अस्लम शेख

काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्याही मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे. राजकीय चर्चा गुवाहाटीत सुरु आहे, इथे राज्याच्या विषयांवर चर्चा झाली. जोपर्यंत मुंबई बंडखोर येत नाहीत, तोपर्यंत सांगता येत नाही. मुंबई, महाराष्ट्रातील पावसाबाबतची चर्चा केली. महाराष्ट्रातील कोविड केसबाबत चर्चा झाली, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिलीय.

सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाणार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु असतानाच आता सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत सर्व पक्षीय नेते, मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचंही या बैठकीत ठरलं. त्यामुळे आता सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाणार हे स्पष्ट झालंय. आपलेच लोक आपल्या विरोधात मतदान करणार का, हे पाहायचं आहे, असं उद्धव ठाकरे बोलल्याचं सांगण्यात येत आहे.