शिवसेना आणि वंचित आघाडीची युती होणार? प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे स्वीकारणार का?

| Updated on: Sep 29, 2022 | 6:41 PM

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का? यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केले आहे.

शिवसेना आणि वंचित आघाडीची युती होणार? प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे स्वीकारणार का?
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. तर, शिवसेना दोन गटात विभागली आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी अनके संघटना उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पाठिंबा देत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर( Prakash Ambedkar) यांनी देखील उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का? यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केले आहे.

माझ्या पक्षाची जी राज्याची कमिटी आहे, तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रकाश आंबेडकरांनी अशाच प्रकारचा प्रस्ताव शिवसेनेला दिला होता.

मात्र, शिवसेनेने या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यावेळी शिवसेना सत्तेत होती. आता शिवसेनेच्या चिरफाळ्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दलित मतांची बेगमी करण्यासाठी शिवसेना प्रकाश आंबेडकरांना हात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक दलित नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. काहींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काहींनी उद्धव ठाकरे यांना भेटून नव्या राजकीय समीकरणाचे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढली आहे. सुषमा अंधारे यांच्या रुपाने शिवसेनेला पक्षाची बाजू मांडणारा दलित चळवळीतील भक्कम वक्ता मिळाला आहे.

दुसरीकडे भीमशक्ती-शिवशक्ती या लढवय्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पँथर भाई कांबळे यांच्यासह संघटनेचे हजारो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. दलित संघटनांनी पडत्या काळात शिवसेनेला साथ दिली आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव स्वीकारल्यास आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप विरोधातील लढाईत शिवसेनेला फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकर यांची मुंबईसह ठाणे जिल्ह्यात चांगली ताकद आहे. शिंदे गटाला पराभूत करण्यासाठी वंचितसोबत युती करण्याची शिवसेनेला आयतीच संधी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना वंचितला सोबत घेऊन नवा राजकीय डाव टाकणार का? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.