औरंगाबाद जिल्हा परिषदेत दोघांना समान मतं, चिठ्ठी किंवा टॉसने अध्यक्षांची निवड ठरणार

| Updated on: Jan 03, 2020 | 5:56 PM

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अध्यक्ष नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Aurangabad Zilha Parishad Election) आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत दोघांना समान मतं, चिठ्ठी किंवा टॉसने अध्यक्षांची निवड ठरणार
Follow us on

औरंगाबाद : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही (Aurangabad Zilha Parishad Election) सर्वच राजकीय पक्षांचा कस लागल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरुन पेचप्रसंग निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतील दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अध्यक्ष नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Aurangabad Zilha Parishad Election) आहे.

दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांची आजची निवड तहकूब करण्यात आली आहे. आता ही निवड उद्या (4 जानेवारी) दुपारी 2 वाजता नव्याने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.

औरंगाबादमधील जिल्हा परिषदेत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर आणि काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांना 29 / 29 मतं पडली आहे. त्यामुळे चिठ्ठी टाकून किंवा टॉस करुन अध्यक्ष निवडणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे या निकालाकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागलं आहे.

तर दुसरीकडे मोनिका राठोड या सदस्यावर दबाव टाकून शिवसेनेने मतदान घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला आहे.

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे भाजप आमदार अतुल सावे आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे स्वत: जिल्हा परिषदेत दाखल झाले. या सर्व गोष्टींमुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेत घमासान पाहायला मिळालं.

राज्यात महाविकासआघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर सत्तास्थापना झाली. त्यानंतर या आघाडीला राज्यात इतर निवडणुकांमध्येही यश मिळालं. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत धक्क्यावर धक्के बसले आहेत. (Aurangabad Zilha Parishad Election). भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेतही फूट पडल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

औरंगाबाद जिल्हापरिषदेतील पक्षीय बलाबल 

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हाच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांचा अध्यक्ष हा नवा फॉर्म्युला त्यासाठी ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते.

सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य भाजपकडे, शिवसेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 3, मनसे 1, डेमोक्राटीक 1 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्यावेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत आपला अध्यक्ष केला होता. त्यानंतर आता अध्यक्षपदावर दावा सांगत शिवसेनेला दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली आहे.