‘ज्यांना माझा पुळका त्यांचाच मला जीवे मारण्याचा प्रयत्न’, मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपसातीलच व्यक्तींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. "ज्यांना माझा पुळका त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला", असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “ज्यांना माझा पुळका आलाय त्यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केला”, असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. पुणे आणि यवतमाळमध्ये झालेल्या हल्ल्यावरुन उदय सामंत यांनी हा आरोप केला. “हे कृत्य जे करुन घेत आहेत त्यांना नियती माफ करणार नाही”, असंदेखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे. पण उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. उदय सामंत यांनी आपल्या कुटुंबाबातही यावेळी भाष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता इतर कोणत्या महत्त्वाच्या नेत्याकडून प्रतिक्रिया देण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
“आमच्या कुटुंबाबद्दल चांगलं बोललं गेलं. त्यांच्याअगोदर 4 दिवस आमच्या कुटुंबावर टीका केली गेली. म्हणजे आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर ज्यावेळी लोकांमधून असा आवाज येतो की, आता मतदान होणार नाही. तेव्हा आम्हाला चांगलं म्हणायचं. पण मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ज्यांना माझ्या कुटुंबाचा आज पुळका आलेला आहे, त्याच लोकांनी माझ्यावर पुण्यामध्ये हल्ला केला होता. त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता”, असा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केला आहे.
“माझ्यावर 15 दिवसांपूर्वीदेखील यवतमाळमध्ये देखील हल्ला केलेला होता. माझ्यावर त्यांनी सहानभूती दाखवण्याची काही गरज नाही. पण हे कुत्ते जे त्यांच्याकडून करुन घेत आहेत, त्यांना नियती माफ करणार नाही एवढंच मला सांगायचं आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे?
उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यांचा रोख हा आपसातीलच कुणावर तरी असल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. उदय सामंत यांचे बंधू किंरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते. स्वत: उदय सामंत यांच्याकडून वारंवार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. पण अखेर ही जागा भाजप नेते नारायण राणे यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला. नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये प्रचंड खलबतं देखील झाली. यानंतर नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली. नुकतीच काल रत्नागिरीत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली.
दुसरीकडे उदय सामंत यांच्या ताफ्यावर काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये हल्ला झाला होता. अज्ञाताने उदय सामंत यांच्या गाडीवर दगड फेकला होता. यानंतर आता उदय सामंत यांचं हल्ल्याबाबतचं वक्तव्य समोर आलं आहे. पण त्यांनी स्पष्टपणे कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर समजू शकलेलं नाही.