उद्धव ठाकरेंचा भाजप आमदारांना फोन, रामगिरीवर जेवायला या, भाजप आमदार म्हणतात…

| Updated on: Dec 18, 2019 | 6:07 PM

एकीकडे फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेला दारं खुली असल्याचं सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं.

उद्धव ठाकरेंचा भाजप आमदारांना फोन, रामगिरीवर जेवायला या, भाजप आमदार म्हणतात...
Follow us on

नागपूर : विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात ऐतिहासिक सत्तापालट झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत घरोबा केला. यात सगळ्यात जास्त जागा मिळूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यानंतर महाराष्ट्राची जनतेला सातत्याने राजकीय सत्तानाट्याचं नवं पर्व पाहायला मिळत आहे (Uddhav Thackeray invite BJP MLA for Dinner). एकीकडे फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेला दारं खुली असल्याचं सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं. भाजपनंही ते स्वीकारलं आहे (Uddhav Thackeray invite BJP MLA for Dinner).

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाहून भाजप आमदारांना आमंत्रणासाठी फोन करण्यात आल्यानंतर भाजप आमदार येणार की त्यावरही बहिष्कार घालणार याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजप आमदार स्नेहभोजनला उपस्थित राहणार असल्याने नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7:30 वाजता ‘रामगिरी’वर मुख्यमंत्र्यानी स्नेहभोजनाचं आयोजन केलं. त्यात महाविकासआघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. शिवसेनेकडून फोन आल्यामुळे भाजप नेत्यांना आणि आमदारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे जुन्या मित्राने दिलेल्या आमंत्रणाला भाजप स्वीकारणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

एकीकडे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं घमासान युद्ध सुरु आहे. सावरकरांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. यावरुन मंगळवारी सभागृहात मोठा गोंधळही पाहायला मिळाला. शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे विधानपरिषदेच्या आधी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमधील तणाव आणखी वाढला.

भाजप-शिवसेनेतील हाच तणाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. यामध्ये भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चौफेर टीकास्त्र डागलं.

एकत्र सत्तेत असताना शिवसेनेचा अग्रलेख असलेल्या सामानात लिहिलेल्या जुन्या मुद्द्यांवरून भाजपने शिवसेनेवर तोफ डागली आहे. भाजपसोबत सत्तेमध्ये असताना सामनातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली होती. त्यावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांनी सभागृहातच ही टीका वाचून दाखवली. त्यामुळे एक खळबळ उडाली. त्यामुळे या राजकीय स्नेहभोजनात नेमकं काय होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.