मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 15, 2020 | 5:58 PM

जळगावातील मुक्ताईनगरत झालेल्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray Muktainagar) यांनी हजेरी लावली.

मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं : उद्धव ठाकरे
Follow us on

जळगाव : “मुक्ताईनगर मुक्त झाले, कोणापासून मुक्त झाले?” असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Muktainagar) यांनी मुक्ताईनगरात जाऊन भाजप नेते एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. जळगावातील मुक्ताईनगरत झालेल्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray Muktainagar) यांनी हजेरी लावली.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसेंचं नाव न घेता टोला लगावला.

यावेळी शरद पवारांनी “या भागात अनेक वाघ आहेत असं मला सांगितलं.पण ते वाघ फोटोच्या स्वरुपात टिपण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोटोग्राफर आहेत”, असं म्हटलं.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही माझ्या फोटोग्राफीचा उल्लेख केला. लहानपणापासून मी वाघात वाढलोय. माझ्या अवतीभोवती ‘वाघ’ होते. पण मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हुशार वाघ निघाले. हा वाघ तुमच्यासाठी धडपडतोय. मुक्ताईनगर आज मुक्त झालं”

काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगवेगळे विचाराचे पक्ष एकत्र आले. पंचवीस-तीस वर्ष आम्ही सोबत लढलो, त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र ज्यांच्या विरोधात 35  वर्ष संघर्ष केला त्यांनी लगेच माझ्यावर विश्वास ठेवला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या ऑपरेशन लोटसवरही टीकास्त्र सोडलं. आता सरकार पाडून दाखवा. एप्रिलमध्ये काय ‘ऑपरेशन लोटस’ करता आताच सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

माझ्या सरकारचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. शेतकऱ्याला मदत कशी द्यायची, पाणी कसे द्यायचे, शेतकऱ्याची कर्जमुक्ती कशी करायची याबाबत विचार सुरु आहे. शरद पवार आमचे खमके मार्गदर्शक आहेत. शिवाय मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांसारखे वाघ माझ्यासोबत असल्यावर मी कुणाला घाबरतो, येऊ द्या कुणाला अंगावर यायचंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री व्हावं हे कधीही माझं स्वप्न नव्हतं. पण शरद पवारांनी मला सांगितल तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. आमच्यावर एकत्र आलो म्हणून सगळ्यांनी टीका केली. म्हणे वेगळ्या विचारांचं सरकार कसं चालेल. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हे महत्वाचं आहे. मी शपथ घेतली तेव्हा मी निर्णय घेतला की पहिला निर्णय हा कर्जमाफी असला पाहिजे.  शपथ नोव्हेंबरच्या शेवटी घेतली आणि डिसेंबरमध्ये कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला.

तुमचे गुलाम म्हणून राहू ही आमची शपथ नव्हती. म्हणे एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस करु. आम्ही तुम्हाला लोटलं. माझं विरोधकांना आव्हान आहे तुम्ही सरकार पाडून दाखवा. आता सरकार पाडून दाखवा, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

मला प्रशासन कळो न कळो, जनतेची कामं होणं महत्वाचं. शेतकरी आमच्या सरकारचा केंद्रबिंदू  आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, कर्जातून पूर्णपणे कसं मुक्त करता येईल यावर माझा विचार सुरु आहे. माणूस संकटाला भिडणारा पाहिजे. तुमचे आशीर्वाद हेच आमच्या सरकारचं बळ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वाघ माझे सोबती, त्यामुळं कोणाला आंगावर यायचे त्यांना येऊदेत. व्यापारी संकुल, एसटी डेपोचा प्रश्न लवकर सोडवू. जनतेच्या हितासाठी असणारी सगळी कामं करणार, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.