महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? सावरकरांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कान उपटले

| Updated on: Dec 19, 2019 | 12:52 PM

'तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मी बोलणार आहे', असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या मुद्दयाला हात घातला

महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? सावरकरांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कान उपटले
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपचे चांगलेच कान उपटले. सावरकर म्हणजे काय? हे दुसऱ्यांना समजून सांगण्याआधी स्वतः समजून घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्री विधीमंडळात (Uddhav Thackeray Sawarkar Speech) बोलत होते. महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? अशा शब्दात गोवंश हत्याबंदीच्या कायद्यावरुन भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू यांचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

‘तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मी बोलणार आहे’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या मुद्दयाला हात घातला. ‘सावरकरांनी जरुर सांगितलं होतं की हिंदू असेल, तर त्याला दोन घास द्या. बाहेरील देशातील हिंदू घ्या, जरुर घ्या. पण त्यांना ठेवणार कुठे? ज्यावेळी काश्मीरमधील ब्राम्हण आपल्याकडे निर्वासित म्हणून आले होते, त्यावेळी केवळ शिवसेनाप्रमुखांनी त्यांना आसरा दिला, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

‘बाहेरील देशातील हिंदूच्या येण्याबद्दल आमची ना नाही, पण त्यांची काळजी घेणार कोण? हा माझा प्रश्न आहे. फडणवीसांनी जे सावरकरांचं वक्तव्य आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. मग बेळगावचे बांधव हिंदू नाहीत का? ते मराठी आहेत. त्यांच्यावर भाषिक अत्याचार होतात. मग आपण त्यांच्यासाठी केंद्रात जाऊन मदत मागू शकत नाही का? सावरकरांना मानत असू, तर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा नाही का? कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आपल्याकडे आणला पाहिजे.’ अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

विधानसभेत उद्धव ठाकरेंचे एकाचवेळी चौकार, षटकार, गुगली आणि यॉर्कर !

‘देशातील हिंदूंना न्याय देऊ शकत नसू, तर कशाला पुळका बाहेरच्या हिंदूंचा? घ्या जरुर घ्या. पण जर भूमिपुत्रांना न्याय देत नसू, तर काय उपयोग? म्हणून मी सावरकरांची आठवण याचसाठी करुन दिली. अखंड हिंदुस्थान… सिंधू नदी ते सिंधू सागरापर्यंत सावरकरांच्या स्वप्नातील हिंदुस्थान आम्हाला हवा आहे, तुम्हाला हवा की नाही हा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा सावरकर म्हणजे काय? हे दुसऱ्यांना समजून सांगण्याआधी स्वतः समजून घ्या’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘गैरसमज करुन घ्यायचा नसेल, तर आणखी एक सांगायचं आहे. आपल्याला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे? सावरकरांचं गायीबद्दलचं मत आपल्याला मान्य आहे. एक निशाण, एक विधान, एक देश, एक कायदा, जरुर पाहिजे, पण जेव्हा गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात, का नाही लागू झाला संपूर्ण देशभर आणि सगळ्या राज्यांमध्ये? माझ्या महाराष्ट्रामध्ये ती माता आणि बाजूला खाता?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

‘किरेन रीजिजू आणि मनोहर पर्रिकर बोलले आहेत. मनोहर पर्रिकरजी दुर्दैवाने आपल्यात नाहीत, गोव्याचे माजी मुख्यमंत्री, कोणत्या पक्षाचे होते मनोहर पर्रिकर? गोमांस कमी पडू देणार नाही, कमी पडलं तर मी बाहेरुन आणेन, असं ते मुख्यमंत्री असताना बोलले होते. रीजिजू स्वतः बोलले मी गोमांस खाणार, काय करायचं ते करा. कोणाला सावरकर शिकवताय? तुम्हाला तरी कळलेत का सावरकर? आम्हाला तरी कळले आहेत का? ज्या कळलेल्या नाहीत, त्यावरुन एकमेकांवर बोलत राहायचं.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray Sawarkar Speech) ठणकावलं.