Uddhav Thackeray : कोश्यारींकडून हिंदूत फूट पाडण्याचं नीच काम ते महाराष्ट्राशी नमक हरामी; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

| Updated on: Jul 30, 2022 | 2:10 PM

Uddhav Thackeray : मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात इतर ठिकाणी लोकांचे प्राण जात होते. तेव्हा कोश्यारींना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यानी पत्रं दिलं. त्यावर मी उत्तर दिलं होतं.

Uddhav Thackeray : कोश्यारींकडून हिंदूत फूट पाडण्याचं नीच काम ते महाराष्ट्राशी नमक हरामी; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
कोश्यारींकडून हिंदूत फूट पाडण्याचं नीच काम ते महाराष्ट्राशी नमक हरामी; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari ) यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलंच वातावरण तापलं आहे. शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या तोडातील वक्तव्य कुणाच्या तरी पोटातून आलं आहे. राज्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. मतांच्या ध्रुवीकरणासाठीच त्यांनी हे विधान केलं आहे. हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मराठी अमराठी असा वाद लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कोश्यारी नावाचं हे पार्सल परत पाठवलं पाहिजे, असं सांगतानाच भगत सिंह कोश्यारी यांनी त्वरीत माफी मागायला हवी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच कोश्यारींना तुरुंगात पाठवणार की घरी पाठवणार? असा जाबच त्यांनी राज्यातील शिंदे सरकारला विचारला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला आहे.

अशी माणसे महाराष्ट्राच्या नशिबी का?

राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील, काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात राहून सर्व काही ओरपलंय

मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात इतर ठिकाणी लोकांचे प्राण जात होते. तेव्हा कोश्यारींना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यानी पत्रं दिलं. त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दलही कोश्यारींनी हिणकस उद्गार काढले. आजही त्यांनी तसेच उद्गार काढले. महाराष्ट्रात राहत आहेत. महाराष्ट्रात राहून सर्व काही ओरपले आहे, पंगत बिंगत मान मरातब घेतला आहे. आणि महाराष्ट्रातच मराठी माणसाचा अपमान केला आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलीय

महाराष्ट्रात मंदिरं आहेत. तळे आहेत. डोंगर आहेत. गड किल्ले आहेत. लेण्या आहेत. महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूर का जोडा नही देखा. कोल्हापूरी वहाण आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याची गरज आहे. कोल्हापुरी वहाण जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो जोडा तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करायचा? त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा असं जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

तर राष्ट्रपतींना कळवावं

अनावधानाने आलेलं हे विधान नाही. काही ठिकाणी राज्यपाल फार तत्परतेने धावतात. तर काही ठिकाणी अजगरासारखे सुस्तावलेले असतात. याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. पावणे दोन वर्ष त्यांनी विधान परिषदेच्या जागा भरल्या नाहीत. राज्यपालांना सदस्य नेमायची गरज वाटत नसेल तर त्यांनी राष्ट्रपतींना कळवावं. सदस्य नेमण्याची गरज नाही, असं राष्ट्रपतींना सांगावं. नियम करावा किंवा त्याची आवश्यकता नसेल तर कळवून टाकावं, असा टोलाही त्यांनी हाणला.

कोश्यारींनी मुंबई आंदण दिली नाही

त्यांची भाषणं कोण लिहून देत माहीत नाही. मुंबईतून लिहिली जातात की दिल्लीतून लिहून येतात हे माहीत नाही. शिवाजी महाराज आणि साधु संताची पावले लागलेला हा महाराष्ट्र आहे. पण त्याची जाणीव राज्यपालांना नाही. ही मुंबई कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. तर ही संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातून मिळालेली मुंबई आहे. मुंबईसाठी फक्त 105 हुतात्मे शहीद झाले नव्हते. एका परदेशी पत्रकाराने एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी रुग्णालयात दोन अडीचशे मृतदेह त्यावेळी पाहिले होते. रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई आहे.

कोश्यारींना घरी पाठवायचे की तुरुंगात?

आज मराठी माणसाचा अपमान केला. मराठी माणसाच्या मनात त्यांनी आग लावली आहे. ते राष्ट्रपतीचे दूत असतात. जातपात धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान वागणूक देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मोडलं असेल तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? दुसरा गुन्हा म्हणजे त्यांनी हिंदूत फूट पाडण्याचं काम केलं आहे. राज्यपालांनी फूट पाडण्याचं काम केलं आहे. हा त्यांचा अधिकार आहे का? ज्या राज्यात जाता तिथे सुखाने नादणाऱ्या लोकांमध्ये फूट पाडून वातावरण खराब करणाऱ्या कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

फूट पाडण्याचं नीच काम

आज हिंदूही चिडले आहेत. काही अमराठी लोकांची चॅनेलने भावना विचारली. तेही चिडले आहेत. असं कधी झालं नव्हतं आणि असं होता कामा नये, असं लोक म्हणत आहे. कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं. हिंदू म्हणून एकवटलेल्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

घरी पाठवायचं की तुरुगात?

ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमक हरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी, सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल, महाराष्ट्रात राहुन जाती पाती आणि धर्मात आगी लावत असेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल त्यांनी गुन्हा केला असेल तर घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या स्तरावर घेतला जावा ही हिंदूंच्यावतीने मागणी आहे, असंही ते म्हणाले.

तोंडातील वक्तव्य कुणाच्या पोटातून आलंय?

राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे. आम्ही मुंबईत दंगली होऊ दिल्या नाही. तुम्ही का आगी लावता? पण राज्यपालांनी पदाची शान घालवली. मी त्या पदाचा आदर करतो. मी त्याचा अनादर करत नाही. त्यांनी या पदाची शान राखावी, तेच शान राखत नसतील तर इतरांनी पत्रास का ठेवावी? हे विधान त्यांच्या ओठी आलंय की टाकलंय माहीत नाही, राज्यपालांच्या तोंडातील वक्तव्य कुणाच्या पोटातून आलं आहे? असा सवाल त्यांनी केला.

राज्यपालांनी माफी मागावी

रामायणात रावणाचे कितीही डोकी उडवले तरी तो मरत नव्हता. बिभीषणाने सांगितलं त्याचा जीव बेंबीत आहे. तसं दिल्लीतील लोकांचा जीव मुंबईत आहेत. ते राज्यपालांनी उघड केलं. केंद्राला मुंबईचा पैसा हवाय हे राज्यपालांनी उघड केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या मनातील हेतू राज्यपालांनी अनावधानाने सांगितला. त्यांच्या ओठी आला. मुंबईचा पैसा आणि वैभव गिळायचं आहे हे सांगितलं. मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे. त्यासाठीच हे सर्व सुरू केलं आहे. महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यासाठीच हे सर्व सुरू आहे. राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.