Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अखेर 72 तासांनी उद्धव ठाकरे बोलणार, जनतेशी संवाद साधताना मोठी घोषणा करणार?

| Updated on: Jun 22, 2022 | 4:57 PM

चारी बाजूंची कोंडीत सापडलेले उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे (Face Book Live) जनतेशी संवाद साधणार आहे. त्यात ते कोणती मोठी घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अखेर 72 तासांनी उद्धव ठाकरे बोलणार, जनतेशी संवाद साधताना मोठी घोषणा करणार?
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेचे निम्म्यापेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. तिथूनच ते उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत आहेत. अशावेळी चारी बाजूंची कोंडीत सापडलेले उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे (Face Book Live) जनतेशी संवाद साधणार आहे. त्यात ते कोणती मोठी घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिंदेंच्या बंडानंतर 72 तासांनी उद्धव ठाकरे बोलणार

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. सोमवारी संध्याकाळी ते आपल्या समर्थक आमदारांसह मुंबईहून सूरतला रवाना झाले. सूरतच्या लि मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांनी एक रात्र आणि एक दिवस मुक्काम केला. तिथून मंगळवारी चार्टर्ड विमानांद्वारे शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आसामच्या गुवाहाटीला रवाना झाले. शिंदेंच्या बंडाला 72 तास उलटल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे बोलणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधतील. राज्यातील चालू घडामोडींवर ते आपली प्रतिक्रिया देणार आहेत.

राजीनाम्याची जोरदार चर्चा

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड, त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या, शिवसेनेकडे उरलेल्या आमदारांची संख्या आणि सरकार अल्पमतात आल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशीही एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या चर्चेचं खंडन करण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, असा दावा आताही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.

एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.