आपण शिवरायांचे वंशज, एकदा पाऊल टाकलं की मागे नाही: उर्मिला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: “खरा तो एकची धर्म, हा साने गुरुजींचा धर्म मी पाळते. समाजात जागरुकता आणणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांसारख्या माणसाची हत्या होते, असे प्रकार कधीपासून घडू लागलेत? असा सवाल करत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, एकदा पाऊल टाकलं की मागे नाही”, असं नमूद केलं. काँग्रेस प्रवेशानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ती टीव्ही 9 मराठीशी बोलत होती. […]

आपण शिवरायांचे वंशज, एकदा पाऊल टाकलं की मागे नाही: उर्मिला
Follow us on

मुंबई: “खरा तो एकची धर्म, हा साने गुरुजींचा धर्म मी पाळते. समाजात जागरुकता आणणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांसारख्या माणसाची हत्या होते, असे प्रकार कधीपासून घडू लागलेत? असा सवाल करत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, एकदा पाऊल टाकलं की मागे नाही”, असं नमूद केलं. काँग्रेस प्रवेशानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ती टीव्ही 9 मराठीशी बोलत होती.

काँग्रेसमध्ये प्रवेश का केला?

“जो पक्ष सत्तेत नाही त्या पक्षात जाणं हे अतिशय धाडसी कृत्य आहे, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. पण जेव्हा आपलं व्यक्तीमत्व आपल्या विचारांवर बनलेलं असतं, त्या विचारांपासून दूर जाऊन भलत्याच लोकांसोबत उभं राहणं अशक्य होतं, ते मी करु शकणार नाही, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला” असं उर्मिला मातोंडकरने सांगितलं.

साने गुरुजींचा धर्म पाळते

“काँग्रेसची विचारधारा साने गुरुजी, राष्ट्र सेवा दलाच्या जवळची आहे. साने गुरुजींनी इतक्या वर्षापूर्वी साध्या सोप्या शब्दात सांगितलंय खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.. हा धर्म मी पाळते, तो एकच धर्म मी पाळते. त्याचा अर्थ मला माझ्या धर्माबद्दल आस्था, प्रेम किंवा ज्ञान नाही असं अजिबात समजू नका. प्रेमाचा धर्म हा देशाचा धर्म आहे. मात्र या प्रेमाच्या धर्मापासून आपण खूप दूर फेकलो गेलो आहोत. केवळ पाच वर्षात हा विचित्र विकास झाला आहे”, असा टोमणा उर्मिलाने लगावला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई प्रचारक की उमेदवार म्हणून लढणार?

या प्रश्नावर उर्मिला म्हणाली, सध्या तरी मी प्रचारक आहे. नेता म्हटलं की विचित्र आणि बिचकल्यासारखं वाटतं. अभिव्यक्ती स्वातंत्र हाच माझा ठाम मुद्दा आहे. अनेक मुद्द्यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा मी मांडणारच. मला कुणीही हिणवलं, घालून पाडून बोललं, तरी मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलणारच, कारण शेवटी आपण शिवाजी महाराजांच्या वंशातले लोक आहोत, एकदा पाऊल पुढे टाकलं की ते मागे येणं नाही, असं उर्मिला म्हणाली.

दाभोळकरांची हत्या

कलाकार हे मृदू मनाचे असतात. ते राजकारणाच्या कात्रीत अडकलेले असतात. आपल्याला नरेंद्र दाभोळकरांची हत्या थांबवता आली नाही, तर आपण कलाकरांवर कशी कमेंट करणार. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर काही दिवस आवाज उठवले. आज कुणाला लक्षात तरी आहे का?  आज लोक का गप्प आहेत?  एवढी मोठी जागरुकता आणणारा माणूस एक दिवस बाहेर जातो आणि त्याला उडवून टाकतात. असं कसं झालं, हे कधीपासून व्हायला लागलं? असा सवाल उर्मिलाने केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत. ते रोखायला हवेत, असं ती म्हणाली.

उत्तर मुंबईतून उमेदवारी?

उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत उर्मिला म्हणाली, सध्या तरी मीडियाने ही उमेदवारी घोषित केली आहे. मला उमेदवारी मिळाल्यानंतर अधिक भाष्य करणं योग्य ठरेल, असं उर्मिलाने नमूद केलं.

VIDEO: