काँग्रेससोबत चर्चा बंद, एमआयएमसाठी दारं अजूनही खुली : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Sep 23, 2019 | 5:59 PM

राज्यात मित्र पक्षाबरोबर आम्ही 288 जागा लढवणार असल्याचं सांगत त्यांनी (VBA Prakash Ambedkar) पुन्हा एमआयएम बरोबर युतीचे संकेत दिले. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आजही माझे चांगले संबंध असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं.

काँग्रेससोबत चर्चा बंद, एमआयएमसाठी दारं अजूनही खुली : प्रकाश आंबेडकर
Follow us on

पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडी बरोबरची चर्चा थांबलेली आहे. मात्र एमआयएम बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे आहेत. मात्र त्यांनी कुलूप लावलं असून चावीही त्यांच्याकडेच आहे. एमआयएमने दरवाजा उघडावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (VBA Prakash Ambedkar) यांनी केलं. राज्यात मित्र पक्षाबरोबर आम्ही 288 जागा लढवणार असल्याचं सांगत त्यांनी (VBA Prakash Ambedkar) पुन्हा एमआयएम बरोबर युतीचे संकेत दिले. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आजही माझे चांगले संबंध असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं.

26 तारखेपर्यंत अंतिम यादी

विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचं काम सुरु असून पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

“आमचं सँडविच करण्याचा डाव होता”

काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. सत्ताधारी सरकार दोन्ही पक्षातील दागी नेत्यांवर बोलत होते. चर्चेत खेळवत ठेवून आमचं सँडविच करण्याचा डाव होता. मात्र हे राजकारण लक्षात आल्यावर आम्ही चर्चा थांबवली, असा दावा आंबेडकरांनी केला. आघाडीबरोबर बोलायचं नाही, मित्रपक्षाला बरोबर घेऊन 288 जागा लढण्याची आमची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

“युतीने डागाळलेल्या नेत्यांसोबत कोणती सेटलमेंट केली?”

काँग्रेस-राष्ट्रवादीतील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्यांवर कारवाई होणं, त्यांची चौकशी होऊन न्यायालयात उभा करणं आवश्यक होतं. मात्र असं काहीच घडलं नाही. त्यामुळे युतीने डागाळलेल्या नेत्यांबरोबर काय समझोता केला हे जाहीर करावं, असं आव्हान आंबेडकर यांनी दिलं. स्वच्छ सरकार म्हणतात, कायदा-सुव्यवस्थेचा सरकार गेलं कुठं, असा सवालही त्यांनी केला.

आम्ही राज्यात एक जातीय सत्ता आणणार नाही. यापूर्वी एका जातीच्या सत्तेतून कुटुंबशाही निर्माण केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मात्र आम्ही लोकशाहीचं सार्वत्रीकरण करतोय. पण आम्हाला जातीयवादी म्हणून ठपका मारत आहे. पण आघाडी आणि युतीने कोणकोणत्या समाजाचे उमेदवार दिले याबाबत माहिती द्यावी, असं आव्हानही आंबेडकरांनी दिलं.