वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेटम, 30 जुलैला पहिली यादी जाहीर करणार

| Updated on: Jul 20, 2019 | 9:17 AM

वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीला युतीचा निर्णय घेण्यासाठी 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर निर्णय न झाल्यास नाईलाजाने 30 जुलैला वंचित आपली विधानसभेच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिला.

वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेटम, 30 जुलैला पहिली यादी जाहीर करणार
Follow us on

अकोला : लोकसभानिवडणुकीनंतर काँग्रेसला युतीचा प्रस्ताव देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. ते केवळ माध्यमांमध्येच प्रतिक्रिया देत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला युतीचा निर्णय घेण्यासाठी 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर निर्णय न झाल्यास नाईलाजाने 30 जुलैला वंचित आपली विधानसभेच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करेल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिला.

पुंडकर म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने पुन्हा काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला आगामी विधानसभेत वंचितशी युती करायची असेल, तर त्यांनी ताबडतोब संपर्क साधायला हवा. हा प्रस्ताव देऊन अनेक दिवस झाले, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. ते जे काही बोलत आहेत ते केवळ माध्यमांमध्येच बोलत आहेत. वंचितशी त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही.”

काँग्रेसकडून प्रतिसाद न आल्याने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु

युतीचा प्रस्ताव देऊनही काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला आमची निवडणुकीची तयारी पूर्ण करून ठेवावी लाग असल्याचेही पुंडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून 30 जुलैपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांशी किंवा वंचित बहुजन आघाडीशी संपर्क केला गेला नाही, तर वंचित 30 जुलैला आपली विधानसभा उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करेल.”

दरम्यान, अकोला येथे काही दिवसांपूर्वी अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय समितीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यावर 30 जुलैला वंचितची पहिली यादी जाहीर होणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. याविषयी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांना विचारणा केली असता त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिल्याने ही चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे.