माझ्यामुळे ‘वंचित’चा बंद अपयशी : रामदास आठवले

| Updated on: Jan 24, 2020 | 4:18 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला बंद माझा पक्ष सहभागी न झाल्यानेच अपयशी झाल्याचा दावा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे (Ramdas Athawale on VBA Maharashtra Band).

माझ्यामुळे वंचितचा बंद अपयशी : रामदास आठवले
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला बंद माझा पक्ष सहभागी न झाल्यानेच अपयशी झाल्याचा दावा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे (Ramdas Athawale on VBA Maharashtra Band). तसेच भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी असल्याचीही आठवण करुन दिली. ते मुंबईत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “आजचा (24 जानेवारी) बंद अनावश्यक होता. भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी होता. आजच्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 99.99 टक्के ठिकाणी बंद नाही, सर्व सुरु आहे. या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी नाही म्हणूनच प्रकाश आंबेडकरांचा बंद फेल ठरला.”

झेंड्याचा रंग बदलण्यापेक्षा मन बदलावं, आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला

रामदास आठवले यांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) बदललेल्या झेंड्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलून भगवा केल्याने फायदा होणार नाही. झेंड्याचा रंग बदलण्यापेक्षा मन बदललं पाहिजे आणि आपली भूमिका बदलली पाहिजे. त्यांनी भारतीय संविधानात असलेली भूमिका घेतली पाहिजे. असं असलं तरी मनसेच्या एनआरसी (NRC) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ मोर्चाला माझा पाठिंबा असेल.”

या’ धोरणामुळे शिवसेनेची कोंडी होईल : रामदास आठवले

राज ठाकरेंनी बदललेल्या धोरणामुळे शिवसेनेची काही प्रमाणात कोंडी होईल, असाही दावा रामदास आठवलेंनी केला. राज ठाकरे यांना किती राजकीय यश मिळतं ते पाहावं लागेल. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर झुकावं लागतंय. ते चक्रव्यूहात सापडले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना-भाजप-रिपाइं सरकार बनवू शकते. कदाचित मनसेला प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मिळणारी मते मिळू शकतात हे नाकारता येणार नाही, असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं.

“भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांवर आक्षेप”

रामदास आठवले म्हणाले, “मी पहिल्यापासून सांगतो आहे की भीमा कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही. पुणे पोलिसांनी तपासाचं काम चांगलं केलं आहे. पण काही अधिकाऱ्यांवर आक्षेप आहेत. कुणावर अन्याय झाला असं वाटत असेल तर शरद पवारांनी चौकशी करावी.”

शरद पवारांची सुरक्षा व्यवस्था काढलेली नाही. कुणाची सुरक्षा काढायची आणि कुणाची नाही यावर अधिकारी चर्चा करतात. मुद्दाम कुणाचीही सुरक्षा काढली जात नाही, असंही आठवलेंनी सांगितलं.

“सत्तास्थापनेच्या काळात फोन टॅप झाले होते का याची कल्पना नाही”

रामदास आठवलेंनी फोन टॅपिंग प्रकरणावर आपलं मत व्यक्त करताना सत्तास्थापनेच्या काळात फोन टॅप झाले होते की नाही याची कल्पना नसल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “लोकसभेला भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे फोन टॅप करून कुणाचा फायदा होणार होता? विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रच लढले. सत्तास्थापनेच्या काळात फोन टॅप झाले होते का? याबाबत मला काही कल्पना नाही.”

व्हिडीओ: