BJP : वेदांता गुजरातला हे ‘मविआ’चेच पाप, बावनकुळेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

| Updated on: Sep 24, 2022 | 7:32 PM

वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे.

BJP : वेदांता गुजरातला हे मविआचेच पाप, बावनकुळेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे टीव्ही 9  पुणे : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे सर्व मतदार संघ पिंजून काढत आहेत. पक्ष संघटनेबरोबर विरोधकांवर त्यांचे टीकास्त्र सुरु असून पुण्यात त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. केवळ शिवसेनेमध्येच मतभेद नव्हते तर राष्ट्रवादीमध्येही (Rashtrawadi Congress) अंतर्गत धूसफूस ही कायम आहे. सध्या सर्वकाही अलबेल असले तरी लवकरच मोठा राजकीय स्फोट (Politics) होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. शिवाय आदित्य ठाकरे हे खोटारडे असून त्यांनी राज्य सरकारवर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. वेदांता प्रकल्प हा तळेगावातच होणार होता तर त्यासाठी घेतलेली जागा त्यांनी दाखवून द्यावी असे आव्हानच त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमधीलही अंतर्गत मतभेद हे समोर येणार आहेत. सध्या सर्वकाही व्यवस्थित वाटत असले तरी या पक्षामध्येही मनभेद झालेले आहेत. योग्य वेळी या पक्षामध्येही राजकीय स्फोट होईल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या घडामोडीवरुन त्यांनी हा दाखला दिला आहे.

वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे. आंदोलन म्हणजे इव्हेन्ट मॅनेजमेंट झाले आहे. केवळ सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ही आंदोलने होते आहेत.

सध्या केंद्रीय मंत्री हे राज्यातील विविध लोकसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. केवळ लोकसभा निवडणूका हाच उद्देश नाहीतर सरकारने राबलेल्या योजना तळागळापर्यंत पोहचल्या का नाहीत याचा देखील आढावा घेतला जात असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

बारामती मतदार संघामध्ये घडाळ्याचा काटा बंद पडला पाहिजे असेच आमचे प्रयत्न राहणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची ओळख आहे. मात्र, याच मतदार संघावर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक पक्षावर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता जनता गंभीरपणे घेत नाही. मुख्यमंत्री असताना ते 18 महिने मंत्रालयात आले नाहीत, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा तरी काय असतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला.