मंदिरात जाणारे भक्त लाखो, दारुच्या दुकानात रांगेतून प्रवेश, अमृता फडणवीसांना विद्या चव्हाणांचे उत्तर

| Updated on: Oct 14, 2020 | 5:47 PM

मंदिरांबाहेर आंदोलन करणं हे भाजपचं राजकारण आहे. त्यांना लोकांच्या आरोग्याची चिंता नाही, असा घणाघात विद्या चव्हाणांनी केला.

मंदिरात जाणारे भक्त लाखो, दारुच्या दुकानात रांगेतून प्रवेश, अमृता फडणवीसांना विद्या चव्हाणांचे उत्तर
Follow us on

मुंबई : ‘बार उघडले, पण देवळं डेंजर झोनमध्ये का?’ असा सवाल विचारणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंनी आहे, पण दारुच्या दुकानांमध्ये जाणाऱ्या व्यक्ती कमी आहेत, असे चव्हाण म्हणाल्या. (Vidya Chavan answers Amruta Fadnavis tweet to reopen temples)

“भाजपने मंदिरं उघडण्यासाठी राजकारण सुरु केलं आहे. भाजपची अत्यंत केविलवाणी परिस्थिती झाली आहे. कारण गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मर्यादित स्वरुपात ठेवूनही त्यावेळी कोव्हिडचे प्रमाण वाढताना दिसले. आता मंदिरांबाहेर आंदोलन करणं हे केवळ राजकारण आहे. त्यांना लोकांच्या आरोग्याची चिंता नाही.” असा घणाघात विद्या चव्हाणांनी केला.

“दारुच्या दुकानांना परवानगी देण्याबाबत अमृता फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट मी टीव्हीवर ऐकलं आणि ते धक्कादायक आहे. तुम्ही देवालय सुरु करत नाही आणि मदिरालय सुरु करता, असं ते म्हणाले. कारण मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंनी आहे आणि दारुच्या दुकानांमध्ये जाणारे खूप कमी आहेत. तिथे रांगा लावून लोक जातात” असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

“देवा-धर्माला विरोध नाही”

“जर मंदिरं आता उघडली तर निश्चितच कोरोनाचे प्रमाण वाढेल. आमचा काही देवांना किंवा धर्माला विरोध नाही. देऊळ, चर्च, गुरुद्वारे काहीही असू देत. पण नागपुरात गर्दी वाढल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी बंद करण्यात आल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे मंदिरं उघडण्यास परवानगी दिलेली नाही” असं विद्या चव्हाण यांनी सांगितलं.

“वाह प्रशासन! महाराष्ट्रात बार आणि दारुची दुकानं सगळीकडे खुलेआम सुरु आहेत. मग मंदिरं धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? बेभरवशाच्या किंवा लहरी प्राण्यांना सामंजस्य सिद्ध करण्यासाठी नक्कीच प्रमाणपत्राची गरज लागते!” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले होते.

नेमकं प्रकरणं काय?

राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख केला होता. राज्यापालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या वक्तव्याचा धागा पकडत राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं आहे.

संबंधित बातम्या :

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा टोला

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरमध्ये कंगनाची उडी, ठाकरे सरकराला ‘गुंडा’ची उपमा

(Vidya Chavan answers Amruta Fadnavis tweet to reopen temples)