आधी राष्ट्रवादी, आता काँग्रेसचीही भूमिका जाहीर, मुख्यमंत्रिपदाचा तिढा जवळपास निकाली

| Updated on: Nov 15, 2019 | 7:54 PM

महासेनाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरुन आपली भूमिका जाहीर केल्यानंतर, आता काँग्रेसनेही आपलं म्हणणं काहीसं स्पष्ट केलं आहे.

आधी राष्ट्रवादी, आता काँग्रेसचीही भूमिका जाहीर, मुख्यमंत्रिपदाचा तिढा जवळपास निकाली
Follow us on

मुंबई : महासेनाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरुन आपली भूमिका जाहीर केल्यानंतर, आता काँग्रेसनेही आपलं म्हणणं काहीसं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar on Maharashtra CM post and Government formation) यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवार यांनी आज शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भांडुपमधील घरी जाऊन, वडेट्टीवार यांनी राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत वडेट्टीवार यांनी राऊत यांचे कौतुक केले. संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते महाराष्ट्रातील राजकारणाचा हिरा आहेत, असेदेखील वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी वडेट्टीवार यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आलं. राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर करताना, पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं म्हटलं आहे, तर काँग्रेसची भूमिका काय?, असं विचारलं असता, आम्हाला आनंद आहे,  असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीचीही जाहीर भूमिका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच

दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची भूमिका स्पष्ट होत असताना, तिकडे राष्ट्रवादीने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं जाहीर सांगितलं आहे. ‘सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार. शिवसेनेला अपमानित करण्यात आलं होतं. त्यांचा स्वाभिमान कायम राखणं ही आमची जबाबदारी आहे’ असं नवाब मलिक ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

14-14-12 मंत्रिपदाचा फॉर्म्युला?

दरम्यान, तीनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. याशिवाय तयार केलेल्या मसुद्यात शिवसेनेला पूर्णकाळ मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक उपमुख्यमंत्री असतील. सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रिपदेही मिळतील, असं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाची खाती सर्वांच्या वाट्याला

महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यानुसार गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता आहे.

नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची चिन्हं आहेत. तर ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात.

(Vijay Wadettiwar on Maharashtra CM post and Government formation)