शिवसेना खासदार विनायक राऊतांकडून चंद्रकांत पाटील यांचं समर्थन

| Updated on: Jan 18, 2020 | 10:53 AM

एकनाथ खडसेंसारख्या निष्ठावंतांना डावललं जात होतं. त्याचा विपरित परिणाम भाजपला भोगावा लागला, असं विनायक राऊत म्हणाले

शिवसेना खासदार विनायक राऊतांकडून चंद्रकांत पाटील यांचं समर्थन
Follow us on

रत्नागिरी : मेगाभरतीमुळे भाजप बॅकफूटवर गेल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं मत योग्य असल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut agrees with Chandrakant Patil) म्हणाले. तर भगवा झेंडा घेताना विचारांचंही अनुकरण केलं जावं, अशी अपेक्षा व्यक्त करत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही हल्लाबोल चढवला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार इनकमिंगमुळे भाजप बॅकफूटवर गेल्याचं केलेलं वक्तव्य खरं असल्याचं सांगत विनायक राऊतांनी पाटलांचं समर्थनच केलं. जो येईल त्याला प्रवेश दिल्यामुळे भाजपची आज ही अवस्था झाली आहे. भाजपमध्ये आलेल्यांचेच लांगुलछालन जास्त झाले, असं विनायक राऊत म्हणाले.

एकनाथ खडसेंसारख्या निष्ठावंतांना डावललं जात होतं. त्याचा विपरित परिणाम भाजपला भोगावा लागला. त्यामुळे मेगाभरती किती करायची, याचे निर्बंध असणं आवश्यक असल्याचं सांगायलाही विनायक राऊत विसरले नाहीत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

मेगाभरती सुरु झाली आणि भाजपचे कल्चर थोडे विचलित झाले, अशी थेट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. तेव्हापासूनच पक्षात चलबिचल सुरु झाली होती. अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अन्य पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशांमुळे पक्षात अस्वस्थता पसरली होती, पण त्याबाबत कोणीही जाहीर मत व्यक्त केलं नव्हतं. सत्ता असल्याने त्यावेळी असंतोष बाहेर पडला नाही. सत्ता गेल्यावर मात्र भाजपच्या जागा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या वेगवेगळ्या चुकांबाबत विचारमंथन होताना आयाराम नेत्यांमुळे फटका बसल्याचा निष्कर्ष निघाल्याचं पाटलांनी सांगितलं.

संख्याबळ वाढवण्याच्या नादात पक्षाचं नुकसान झाल्याची उपरती चंद्रकांत पाटील यांना झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी येथे भाजप शहराध्यक्ष निवडीवेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

मनसेवर घणाघात

दरम्यान, शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचे अनुकरण इतरांनी करावे, असा सल्ला खासदार विनायक राऊत यांनी दिला. मनसेच्या भगव्या  झेंड्यामुळे शिवसेनेवेर परिणाम होईल, याची चिंता आम्हाला करण्याची गरज नसल्याचं मतही विनायक राऊत यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. अजूनही 11 हजार कोटी केंद्राकडून महाराष्ट्राला येणं आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली. बेळगावात मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत कर्नाटक पोलिसांनी केलेली वागणूक चुकीची असल्याचंही विनायक राऊत म्हणाले.

नाईट लाईफस्टाईलचा फायदा मुंबईच्या पर्यटनाला होईल. शिवसेनासुद्धा नाईट लाईफचे समर्थनच करणार असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट (Vinayak Raut agrees with Chandrakant Patil) केलं आहे.