नवी दिल्ली : भाजप (BJP) खासदार सत्यपाल सिंह (Satyapal Singh) यांनी पुन्हा एकदा डार्विनचा सिद्धांत खोटा ठरवला आहे. संसदेतील चर्चेत सहभागी होताना सत्यपाल सिंह म्हणाले, “मानवा हा निसर्गाची रचना आहे. आपले पूर्वज ऋषी होते. आपले वंशज वानर होते अशी ज्यांची भावना आहे, त्या मला दुखवायच्या नाहीत”
संसदेत मानावाधिकार संरक्षण संशोधन विधेयक 2019 ला विरोधकांनी विरोध केला आहे. त्याला उत्तर देताना सत्यपाल सिंह यांनी हे उदाहरण दिलं. ते “म्हणाले भारतीय संस्कृतीत कधी मानवाधिकारावर चर्चा झाली नाही, त्याऐवजी सदाचारी मानवाच्या चरित्राबाबतच्या चर्चेवर जोर देण्यात आला. वेदांमध्ये आपल्याला सदाचारी मानव बनण्याची शिकवण दिली आहे. आपली संस्कृती मानवतेची शिकवण देते”
यावेळी सत्यपाल सिंह यांनी संस्कृतमधील एक दाखलाही दिला. ते म्हणाले, “मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये गेल्याने धर्माची कसोटी पूर्ण होत नाही. धर्माच्या शिकवणीनुसार आपण तसं आचरण करायला हवं. जर मला त्रास होऊ नये असं वाटत असेल, तर मी सुद्धा दुसऱ्याला त्रास देऊ नये, ही धर्माची शिकवण आहे”
दरम्यान, सत्यपाल सिंह यांनी यापूर्वीही डार्विनचा सिद्धांत खोडून काढला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचं असून, आपण वानराचे वंशज नाही, असं ते म्हणाले होते.