भाजपच्या मतांचं विभाजन करण्यासाठी आम्ही उमेदवार दिलेत : प्रियांका गांधी

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

रायबरेली : उत्तर प्रदेशात आता पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. यूपीत भाजप मोठ्या फरकाने हरणार असल्याचा दावा काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केलाय. काँग्रेस मजबूत आहे तिथे आमचे उमेदवार जोरदार टक्कर देत आहेत, पण भाजपचा पराभव व्हावा यासाठी आम्ही असे काही उमेदवार दिले आहेत, जे भाजपच्या मतांचं विभाजन करतील, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या. […]

भाजपच्या मतांचं विभाजन करण्यासाठी आम्ही उमेदवार दिलेत : प्रियांका गांधी
Follow us on

रायबरेली : उत्तर प्रदेशात आता पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. यूपीत भाजप मोठ्या फरकाने हरणार असल्याचा दावा काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केलाय. काँग्रेस मजबूत आहे तिथे आमचे उमेदवार जोरदार टक्कर देत आहेत, पण भाजपचा पराभव व्हावा यासाठी आम्ही असे काही उमेदवार दिले आहेत, जे भाजपच्या मतांचं विभाजन करतील, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकद लावली आहे. अमेठी आणि रायबरेली या आई आणि भावाच्या मतदारसंघांवर त्यांचं विशेष लक्ष आहे. या दोन्ही मतदारसंघांसोबतच त्यांनी अयोध्या, झांसी आणि लखीमपूरमध्येही रोड शो केला. विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन प्रियांका गांधी सभा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रियांका गांधींवर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

एका राष्ट्रीय पक्षाने मतं खाणारे उमेदवार दिले असल्याच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. कारण, निवडणुकीत अपक्ष आणि डमी उमेदवार अनेकदा मतांचं विभाजन करतात आणि याचा फटका मुख्य पक्षांच्या उमेदवारांना बसतो. पण काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने मतांचं विभाजन करण्यासाठी उमेदवार दिल्याचं वक्तव्य केल्याने निवडणुकीअगोदरच पराभव पत्करलाय का, असाही प्रश्न उपस्थित होतो. पण मतांचं विभाजन करणारे उमेदवार फक्त यूपीत दिलेत की संपूर्ण देशात याबाबत प्रियांका गांधींनी सांगितलं नाही.

2014 मध्ये संपूर्ण देशासह उत्तर प्रदेशात काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. 80 पैकी फक्त दोन जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. या दोन जागाही अमेठी आणि रायबरेली होत्या, जे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत मानली जाते.