West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!

| Updated on: May 03, 2021 | 4:04 PM

यंदा पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस खातंही उघडू शकली नाही. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 2.93 टक्के मतं मिळाली आहेत. ही परिस्थिती डाव्यांचीही आहे.

West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधली आहे. भाजपचं तगड आव्हान मोडून काढत ममता बॅनर्जी यांनी एकहाती यश मिळवलं आहे. 292 पैकी 213 जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत. इतकच नाही तर तृणमूल काँग्रेसनं भाजपपेक्षा 10 टक्के अधिक मत मिळवली आहेत. टीएमसीला जवळपास 48 टक्के तर भाजपला 38 टक्के मत प्राप्त झाली आहेत. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे एकेकाळी सत्तेत राहिलेल्या काँग्रेस आणि डाव्यांना मात्र मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. (Congress and the Left did not have a single MLA in west Bengal)

2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दुसरा मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस खातंही उघडू शकली नाही. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 2.93 टक्के मतं मिळाली आहेत. ही परिस्थिती डाव्यांचीही आहे. डाव्यांनी काँग्रेस आणि पीरजादा अब्बास सिद्दीकी यांचा पक्ष इंडियन सेक्युलर फ्रंटसोबत आघाडी केली होती. वाम मोर्चा – काँग्रेस आघाडीला एकही जागा मिळू शकली नाही. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस आणि डाव्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे बंगालच्या जनतेनं डाव्यांना आणि काँग्रेसला नाकारल्याचं स्पष्ट दिसत आहे.

काँग्रेस, डाव्यांचा दारुण पराभव

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे की, काँग्रेस आणि डाव्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 44 तर माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 26 जागांवर विजय मिळाला होता. 2011 मध्ये डाव्यांची सत्ता गेली तेव्हा काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.

2011 मधील निवडणुकीत डाव्यांना 40 जागा मिळाल्या होत्या. 1977 पासून 2006 पर्यंत डाव्यांची सत्ता होती तेव्हा काँग्रेस कधीही शून्यावर पोहोचली नव्हती. काँग्रेसला 2006 मध्ये 21, 2001 मध्ये 26, 1996 मध्ये 82, 1991 मध्ये 43, 1987 मध्ये 40, 1982 मध्ये 49, तर 1977 मध्ये 20 जागा मिळाल्या होत्या.

..तर भाजपने 50चा आकडाही गाठला नसता- ममता बॅनर्जी

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं. निवडणूक आयोगाची एकंदरित वागणूकच भयंकर होती, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केले. तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात…

Congress and the Left did not have a single MLA in west Bengal