सातारा : राज्यात (Dussehra Rally) दसरा मेळाव्यावरुन घमसान सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा (Shiv Sena) शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावरुन रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच बिग बॉस फेम (Abhijit Bichukle) अभिजीत बिचुकले यांनी जनतेला एक सल्ला दिला आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले बिचकुले यांनी जनतेला सभा ऐकायलाच जाऊ नका असा सल्ला दिल्याने भूवया उंचावल्या आहेत. शिवाय शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत. त्यामुळे जनतेने आपलाच विचार करावा असेही त्यांनी सुचवले आहे.
अभिजीत बिचुकले हे कवी मनाचे नेते आहेत. शिवाय राज्यातील घडामोडीवर त्यांची सातत्याने वक्तव्य समोर येत असतात. सध्या राज्यात एकच चर्चा असून दसरा मेळाव्यावरून राजकारण सुरु आहे. पण यामध्ये दसऱ्याचे कुणाला काही देणे-घेणे नाही. शिवसेना आणि शिंदे गटाला राजकीय स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला ठेऊन दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावरुन राजकारण केले जात असल्याची खरमरीत टीका त्यांनी दोन्ही गटावर केली आहे.
सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे जनतेच्या हिताचे नाही तर कोण मोठा यावरुनच सुरु आहे. विकासाचे कुणाला राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या स्वार्थाचे राजकारण यशस्वी होऊ द्यायचे नसेल तर या मेळाव्याकडे जनतेने पाठ फिरवणेच महत्वाचे ठरणार असल्याचे बिचकुले यांनी सांगितले आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
शिवतीर्थावर दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची गेल्या 56 वर्षांची परंपरा आहे. दसऱ्या दिवशी या मैदानावरुन शिवसैनिकांना संबोधित केले जाते. पण यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला आहे. आपलीच खरी शिवसेना या हेतूने शिंदे गटाने हा अर्ज केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी दसरा मेळावा कुठे घेणार यावरुन सूचक वक्तव्य केलेली आहेत. शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा होणार हे जरी स्पष्ट नसले तरी बिचकुले यांनी दिलेला सल्ला जनतेच्या पचनी पडणार हे पहावे लागणार आहे.