Sanjay Raut : उद्धव, आदित्य ठाकरेंबद्दल आपुलकी, पण संजय राऊतच बंडखोरांच्या रडारवर का?; वाचा कोण काय म्हणालं?

| Updated on: Jul 06, 2022 | 4:33 PM

Sanjay Raut : शिवसेनेची भाजपबरोबर युती होती. ही नैसर्गिक युती आहे. त्यामुळे भाजपसोबत राहिलं पाहिजे, असं या आमदारांचं मत आहे.

Sanjay Raut : उद्धव, आदित्य ठाकरेंबद्दल आपुलकी, पण संजय राऊतच बंडखोरांच्या रडारवर का?; वाचा कोण काय म्हणालं?
संजय राऊतच बंडखोरांच्या रडारवर का?; वाचा कोण काय म्हणालं?
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या (shivsena) 40 आमदारांनी बंड केलं. दहा दिवस सुरत आणि गुवाहाटीत मुक्काम ठोकल्यानंतर या बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचा (bjp) उमेदवारही निवडून आणला. विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपआपल्या मतदारसंघात आले. कामांना सुरूवातही केली. पण या सर्व काळात बंडखोरांनी उद्धव ठाकरेंवर एका शब्दानेही टीका केली नाही. आदित्य ठाकरेंवरही टीका केली नाही. उलट ठाकरे कुटुंबाविषयी प्रत्येक बंडखोर आपुलकी दाखवत होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा आक्षेप नाही. उद्धव ठाकरे देव माणूस आहे, असंही काही आमदार बोलत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांची स्तुती करताना संजय राऊतांवर मात्र सर्वच आमदार टीका करत होते. संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटल्याचा आरोपही काही आमदार करत होते. राऊत अचानक बंडखोरांच्या रडारवर आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच या बंडखोरांनी राऊत का रडारवर आले, तेही सांगितलं.

राऊतांची भाषा खटकली

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भाषेला बंडखोर आमदारांचा सर्वाधिक आक्षेप होता. राऊत हे अत्यंत खोचक शब्दात टीका करतात. मनाला लागेल असं ते बोलतात. ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, असा आक्षेप बंडखोरांनी केला होता. राऊतांचा अॅटिट्यूड योग्य नव्हता. बंड केल्यानंतर सर्वांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी राऊत बाप काढत होते. टीका करत होते. त्यामुळे आम्ही दुखावले गेलो होतो, असं या आमदारांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीशी सलगी आवडली नाही

राऊतांचे राष्ट्रवादीशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी त्यांचे अधिक चांगले संबंध आहेत. राऊत राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना संपवत असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पवार जसं सांगतात तसंच ते ऐकतात, असाही काही आमदारांचा आरोप आहे. त्यामुळेही राऊत या आमदारांच्या रडारवर आले आहेत.

आघाडी आवडली नाही

शिवसेनेची भाजपबरोबर युती होती. ही नैसर्गिक युती आहे. त्यामुळे भाजपसोबत राहिलं पाहिजे, असं या आमदारांचं मत आहे. पण राऊत यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची आघाडी घडवून आणली. ही आघाडी बंडखोर आमदारांना आवडली नव्हती. त्याबद्दल या आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, राऊत यांच्यापुढे पक्षनेतृत्व जात नव्हते. त्यामुळेही बंड करताच या बंडखोरांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

पक्षात अवास्तव महत्त्व

बंडखोर आमदारांना सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे राऊत यांच्यासह काही लोकांना पक्षात अवास्तव दिलेलं महत्त्व. जे नेते लोकांमधून निवडून आलेले नाहीत. ज्यांनी कधी आंदोलन मोर्चा काढला नाही. जे कधी लोकांच्या समस्यांना धावून गेले नाही, अशांना शिवसेनेत महत्त्व आहे. त्यात राऊत सुद्धा असल्यानेही राऊत बंडखोरांच्या रडारवर आले आहेत.

कोण काय म्हणालं?

संदीपान भुमरे : आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही राज्यसभेला आणि विधानपरिषदेत पक्षांनी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केलं. संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार झालो नाही. तर आमच्यामुळे राऊत खासदार झाले. राऊत हे उरलेली सेना संपवतील. सेनेत राहिलेले लोक पण ते घालवून देतील. उरलेले लोक पण आमच्या संपर्कात आहेत. राऊत यांच्यामुळेच हे बंड झालं, या सगळ्या प्रकाराला राऊत जबाबदार आहेत.

किशोर पाटील : महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची वाताहत होत होती. त्यामुळेच पक्षाला वाचवण्यासाठी 40 आमदारांनी बंड केले. संजय राऊतांनी आमच्यावर केलेली टीका क्लेशदायक आहे. त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नको होतं.

भारत गोगावले : आमचं उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पक्षाची वाट लावलीय. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे बंडखोरीची वेळ आली.

संजय राठोड : उद्धव ठाकरेना समजावण्यात मला आणि गुलाबराव पाटील यांना यश आलं होतं. उद्धव ठाकरे हे तयार झाले होते. सुरतला आदित्य ठाकरेंना पाठवयचं म्हणून ठरलंही होतं. मात्र संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे विरोधात बोलणे सुरू केले म्हणून ते फिस्कटले. राऊत यांच्या मुळे बंडखोरी करण्याची वेळ आली.