Rajya Sabha Election : संजय राऊत पुन्हा पुन्हा घोडेबाजारावर गृहखात्याचं लक्ष असल्याचं का सांगतायत? आघाडीचे आमदार फुटीची भीती?

| Updated on: May 30, 2022 | 4:11 PM

Rajya Sabha Election : संभाजीराजेंना कशाप्रकारे फसवण्याचा भाजपकडून कशा प्रकारे प्रयत्न होत होता ते यातून स्पष्ट होत आहे. त्यांना यात स्वतःचा उमेदवार टाकायचा होता व त्यांना घोडेबाजार करायचा होता

Rajya Sabha Election : संजय राऊत पुन्हा पुन्हा घोडेबाजारावर गृहखात्याचं लक्ष असल्याचं का सांगतायत? आघाडीचे आमदार फुटीची भीती?
संजय राऊत पुन्हा पुन्हा घोडेबाजारावर गृहखात्याचं लक्ष असल्याचं का सांगतायत?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून (rajya sabha election) माघार घेतली. त्यानंतर भाजपने (bjp) फक्त दोनच उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सहाव्या जागेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार बिनविरोध निवडून येतील अशी चर्चा रंगली. पण ही चर्चा अल्पकाळच चालली. कारण भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचेच नेते धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली. इतकेच नाही तर महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज भरून विजयाचा दावाही केला. आपले वरिष्ठ नेतेही अपक्षांशी चर्चा करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट महाडिक यांनी केला. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला नसता तर नवलच. त्यामुळे कधी नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिवसभरात मीडियाशी तीनवेळा संवाद साधला. या तिन्हीवेळेस घोडेबाजारावर राज्य सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं आणि गृहखात्याचं लक्ष असल्याचं सांगितलं. तिन्ही वेळेस राऊत यांनी एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने आघाडीला अपक्ष आमदार फुटीची भीती असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राऊत सकाळी काय म्हणाले?

संजय राऊत यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साहजिकच राज्यसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. संभाजीराजेंना कशाप्रकारे फसवण्याचा भाजपकडून कशा प्रकारे प्रयत्न होत होता ते यातून स्पष्ट होत आहे. त्यांना यात स्वतःचा उमेदवार टाकायचा होता व त्यांना घोडेबाजार करायचा होता व यामुळे संभाजीराजेंची भाजपकडून ढाल करण्यात आली. ठिक आहे. आपल्याकडे लोकशाही आहे व प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा प्रकारच्या निवडणुका लढणार असतील तर या सर्व घडामोडींवर सरकारचं सुद्धा बारीक लक्ष आहे, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमच्याकडे पुरेशी मते

त्यानंतर राऊत यांनी दुपारी पुन्हा मीडियाशी संवाद साधला. लोकशाहीत कुणाला निवडणूका लढवायच्या असल्यास लढवू शकतात. पण कोणी घोडेबाजर करायचे प्रयत्न करून नये. जसे केंद्राकडून त्यांचे लक्ष आहे. तसे आमचे पण लक्ष आहे. गृह खात्याचे आणि मुख्यमंत्र्यांचेही लक्ष आहे. निवडणुकीत ईडी, सीबीआयचा वापर करू असं त्यांना वाटत असेल. पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असं राऊत म्हणाले. निवडणूक झाली तर चांगलं आहे. नाही झाली तरीही चांगलं आहे. आमच्याकडे पुरेशी मते आहेत. अपक्ष आमदारही आमच्याचसोबत आहेत, असंही ते म्हणाले.

आपटून आपटून चपटी होईल

राऊत काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. आम्ही सुध्दा शतरंज के खिलाडी आहोत. आम्हाला खेळताही येते आणि तुम्हाला खेळवताही येते. आमचे आमदार फुटणार नाहीत. उलट तुमचे नशिब फुटले आहे. या राज्यात भाजपची सत्ता कधीच येणार नाही. त्यामुळे कोणी कितीही आपटू दे. आपटून आपटून चपटी होईल. पण राज्यात सत्ता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.