अजितदादा यांना अर्थमंत्रीपद द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, शिंदे गटाला दिल्लीची तंबी; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 15, 2023 | 11:03 AM

मी स्वत:हून कृषीमंत्रीपद सोडलं असं अब्दुल सत्तार म्हणत आहेत. त्यांचं हे विधान हस्यास्पद आहे. सत्तारांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं आहे. सत्तार यांच्यासह शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना जावं लागणार आहे.

अजितदादा यांना अर्थमंत्रीपद द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, शिंदे गटाला दिल्लीची तंबी; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं आहे. अजित पवार यांनी केवळ अर्थ खातंच मिळवलं नाही तर शिंदे गटाकडील मदत आणि पुनवर्सन तसेच कृषी खातंही हिसकावून घेतलं आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाने अगदी दिल्लीपर्यंत जाऊन अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध केला होता. मात्र, त्यात शिंदे गटाला यश आलं नव्हतं. दिल्लीत नेमकं काय घडलं होतं? शिंदे गट आणि भाजपच्या दिल्लीतील हायकमांडची काय चर्चा झाली होती. शिंदे गटाची मागणी कधी धुडकावून लावण्यात आली होती. याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या माहितीनुसार शिंदे गट दिल्लीला गेला होता. दिल्लीने यांचं काहीही ऐकलं नाही. राहायचं असेल तर राहा आणि तर जा. अर्थ खातं अजित पवार यांना द्यायचं नसेल तर अर्थ खातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असा प्रस्ताव दिल्लीने शिंदे गटासमोर ठेवला होता. त्या प्रस्तावावर शिंदे गट मागे आला. ही माझी माहिती पक्की आहे. अर्थ खात्याचा कौल अजित पवार यांच्या बाजूनेच पडला आहे. तो त्यांच्याकडेच राहणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

जमीन अस्मानचा फरक

शिंदे गट आणि अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक आहे. अजितदादाच्या गटात अनेक तालेवार नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगलं आहे. अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचं भलं होणार नाही. तरीही अजितदादांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचं महत्त्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतं होतं. आता त्यांचं महत्त्व संपलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

टाळ्या वाजवाव्या लागतील

शिंदे गट हा राज्यकर्ता पक्ष नाही. येतील तसे जातील. अजित पवारांचा गट सत्तेत फार काळ राहील असं वाटत नाही. भाजपचं धोरण वापरा आणि फेका राहिलं आहे. भाजपने देशातील अनेक पक्ष वापरले आणि फेकले. दोन्ही गटाची अवस्था त्यापलिकडे होणार नाही. शिंदे गटाला अजित पवार यांची धुणीभांडी करावेच लागेल. अजित पवार यांचा निधी ही दुसरी बाजू आहे. अजित पवारच आमच्यासोबत नको. राष्ट्रवादीच नको हे शिंदे गटाचं म्हणणं होतं. आता त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नाही. अर्थ खातं देऊ नये म्हणून त्यांनी आपट आपट आपटली. पण काहीच झालं नाही, असा टोला त्यांनी लगावला.