हीच ती वेळ आहे… आदित्य ठाकरेंसाठी वरळीत युवासेनेची पोस्टरबाजी

| Updated on: Sep 01, 2019 | 11:31 AM

'हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची' असं लिहिलेले पोस्टर वरळीत लावून आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला युवासेनेने पाठिंबा दर्शवला आहे

हीच ती वेळ आहे... आदित्य ठाकरेंसाठी वरळीत युवासेनेची पोस्टरबाजी
Follow us on

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वरळी मतदारसंघातून (Worli Vidhansabha Constituency) विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना (Shivsena) आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी (Yuvasena Poster) करण्यात येत आहे.

संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिलेच सदस्य असतील.

आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचं नेतृत्व करावं, अशी मागणी वरळी मतदारसंघातील गटप्रमुखांनी केली होती. ही मागणी अनिल परब यांनी उचलून धरली. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे, अशी मनिषाही त्यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकून आणणार, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही वरळीत शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी युवासेनेने आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनीही आपली इच्छा बोलवून दाखवली होती. अनिल परब यांच्या मागणीचं आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं.

सध्या सुरु असलेल्या आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतही अनेक जण त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहेत. आदित्य ठाकरे यांना अनेकदा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारले आहेत. पूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे, जनतेने आदेश दिल्यास नक्की लढेन, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर हात जोडून सूचक मौन बाळगलं होतं.